मराठी समाजमनावर १९६१ ते १९९१ या कालखंडात अमीट ठसा उमटविणाऱ्या ‘साप्ताहिक माणूस’च्या तीन दशकांचे संचित आता डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन होणार आहे. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘माणूस प्रतिष्ठान’ने ३० वर्षांतील सर्व अंकांचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ‘माणूस’च्या या सर्व अंकांचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे हा समग्र वैचारिक ठेवा यापुढील काळात सर्वासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुला राहण्यास मदत होणार आहे. त्याच हेतूने अनेकांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती माणूस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वंदना भाले यांनी दिली. आतापर्यंत प्रतिष्ठानतर्फे गेली २० वर्षे ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आणि पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘श्रीगमा विधायक कृतिशीलता’ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यंदापासून या प्रकल्पाचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे, असे भाले यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच आणि विशेष करून साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. १९६० ते १९९० अशा तीन दशकांमध्ये अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळी होत होत्या. वेगवेगळ्या विचारसरणींची माणसे एकत्र येऊन सर्वच क्षेत्रांत नवे प्रयोग करीत होती. सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक तरूण स्वत:ला स्वयंस्फूर्तीने या कामामध्ये झोकून देत होते. ‘साप्ताहिक माणूस’चे संस्थापक-संपादक श्री. ग. माजगावकर यांनी ‘माणूस’च्या माध्यमातून या चळवळींविषयी आणि जगभरातील ठळक घडामोडींचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केले. हे विश्लेषण मराठी वाचकांसमोर ठेवत मराठी माणूस सकस माहितीने समृद्ध कसा होईल याकडे माजगावकर यांचा कटाक्ष होता. कोणत्याही घटनेवर ‘श्रीगमा’ काय म्हणतात याकडे वाचकांचे लक्ष असायचे. सकस स्वरूपाचे वैचारिक लेखन देत मराठी साप्ताहिकाचा खप वाढविताना माजगावकर यांनी वाचकांची पिढी घडविली. या माध्यमातून विविध क्षेत्रांतील लेखक घडले. सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना श्रीगमांनी लिहिते केले. सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देऊन विविध चळवळींना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी कृतिशील पाठिंबा दिला. ‘साप्ताहिक माणूस’च्या अंकांमध्ये या सर्वाचे प्रतिबिंब नेहमीच बघायला मिळत असे.