साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था हा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या त्रमासिक मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरीयल नंबर’ (आयएसएसएन) प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या नामावलीमध्ये समावेश झाला आहे. या पत्रिकेसाठी लेखन करणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना लाभ होणार आहे. शतकोत्तर दशकपूर्ती केलेली महाराष्ट्र साहित्य परिषद ही वाङ्मय क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिका या परिषदेच्या मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरीयल नंबर’ (आयएसएसएन) प्राप्त झाला आहे. २४५६-६५६७ हा आयएसएसएन क्रमांक आहे. हे मानांकन मिळविण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. परिषदेचा १११ वा वर्धापनदिन शनिवारी (२७ मे) साजरा होत असताना हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याने परिषदेला एक जागतिक बहुमान लाभला असल्याची भावना कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या आगामी अंकापासून पत्रिकेच्या मुखपृष्ठावर डाव्या कोपऱ्यात ठळक अक्षरात आयएसएसएन क्रमांक प्रसिद्ध केला जाणार आहे. या मानांकनामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेच्या नामावलीमध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा समावेश झाला आहे. त्यामुळे पत्रिकेमध्ये संशोधनपर लेखन करणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्याचा फायदा होणार आहे. याखेरीज महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पत्रिकेचा अंक पोहोचण्यास मदत होणार आहे. हे मानांकन मिळविण्यासाठी पत्रिकेचे संपादक पुरुषोत्तम काळे, संदीप सांगळे आणि संदीप खाडे यांचे सहकार्य लाभले आहे. टपाली खर्चात मोठी बचत राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व १३ हजार आजीव सभासदांना महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा त्रमासिक अंक पाठविला जातो. सध्या हा अंक पाठविण्यासाठी प्रत्येक अंकाला दोन रुपये टपाली खर्च येतो. आयएसएसएन मानांकनामुळे आता प्रत्येक अंकाचा टपाली खर्च पंचवीस पैसे इतकाच होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक पाठविण्यासाठीच्या टपाली खर्चात मोठी बचत होणार असून हा निधी साहित्य परिषदेच्या अन्य प्रकल्पांसाठी वापरता येणे शक्य होणार असल्याची माहिती परिषदेच्या कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनी दिली. काय आहे महाराष्ट्र साहित्य पत्रिका? महाराष्ट्र साहित्य परिषदेला घटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर १९१२ मध्ये अकोला येथे झालेल्या संमेलनामध्ये परिषदेचे मुखपत्र असावे हा निर्णय घेण्यात आला. मराठी वाङ्यमातील नवे प्रवाह आणि समीक्षा यांचा वेध घेण्याच्या उद्देशातून परिषदेतर्फे १९१३ मध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे मुखपत्र सुरू करण्यात आले. सुरुवातीची दोन वर्षे हे मुखपत्र मासिक स्वरूपात निघत होते आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाला जोडून वितरित केले जात होते. ना. गो. चापेकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, माधवराव पटवर्धन, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. म. माटे, यशवंत पेंढरकर, रा. शं. वाळिंबे, डॉ. वि. भि. कोलते, दि. के. बेडेकर, श्री. के. क्षीरसागर, स. गं. मालशे, डॉ. भालचंद्र फडके आणि डॉ. हे. वि. इनामदार अशा दिग्गजांनी पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. साहित्य पत्रिकेमध्ये आपले लेखन प्रसिद्ध होणे हा त्या लेखक आणि प्राध्यापकाचा बहुमान समजला जातो.