मनीषा बाठे (अनुवादक आणि प्रकाशिका) उच्च शिक्षणासाठी सातारा-पुणे असा प्रवास सुरू झाला आणि प्रवासादरम्यान आध्यात्मिक पुस्तके आणि शैक्षणिक पुस्तकांचा अभ्यास सुरू झाला. एसटीतील वाहक मला त्यासाठी रात्री गाडीतील दिवा लावून देत असत. यामुळे वाचनाकरिता कधीही, कुठेही मला अडथळा निर्माण झाला नाही, हेही तितकेच खरे आहे. इतर भाषांचा अभ्यास करताना तंजावर, मध्य प्रदेश, वडोदरा, दिल्लीसारख्या ठिकाणी जाणे होत असे. तेथे गेल्यावर मराठी आणि अमराठी पुस्तकांची खरेदी मी मोठय़ा प्रमाणात केली. माझ्या संग्रहात आजमितीस सहा राज्यांमधील नऊ भाषांतील ५० कोश आहेत. तर व्याकरणाची दीडशेहून अधिक पुस्तके आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सामोरे जावे लागले अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे संघर्ष आणि विविध भाषा शिकण्यासाठी आलेल्या संधी. घरामध्ये शिक्षणाची कोणतीही पाश्र्वभूमी नसतानाही माझी आई (रेखा बाठे) हिच्यामुळे आज मी अनेक पुस्तकांचे अनुवाद आणि प्रकाशन करू शकले. विविध विषयांतील आणि भाषांतील पुस्तके हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक. सामान्यपणे आपल्याला मराठी, िहदी, इंग्रजी, संस्कृत या भाषा अवगत असतात. परंतु त्याही पलिकडे जाऊन गुजराती, कन्नड, उर्दू, बंगाली या भाषांसह मोडी लिपीचा अभ्यास करण्याच्या वाटा माझ्या आयुष्यात विविध टप्प्यांवर खुल्या होत गेल्या. त्यामुळे साताऱ्यातून पुण्यामध्ये पाऊल ठेवताना केलेला संघर्ष आणि भाषाप्रेम यामुळे मी आज यशस्वीतेच्या पायऱ्या चढत आहे. सज्जगडावरच्या सुसज्ज ग्रंथालयापासून ते देशभरातील विविध शहरांमध्ये असलेल्या बहुभाषिक पुस्तक दुकानांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पुस्तकांसाठी माझ्या जवळचा संबंध आला. याकरिता मला आईकडून मिळालेली साथ मोलाची होती. त्यामुळेच आज मराठी या माझ्या मातृभाषेप्रमाणेच अकरा अमराठी भाषांमधील पुस्तकांचा संग्रह ही माझी खरी श्रीमंती आहे. माझं मूळ गाव सातारा. आमची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. डॉ. दत्तात्रय ऊर्फ बाबा पेंढारकरांच्या हॉस्पिटलमध्ये माझी आई नोकरी करीत होती. त्यामुळे पेंढारकर कुटुंबाशी आमचा जवळचा संबंध होता. माझ्या घरापेक्षा मी बाबा पेंढारकरांच्या घरामध्ये जास्त वेळ रमत असे. इयत्ता तिसरीमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त श्री समर्थचरित्रामृत हे माझ्या हातात पडलेले पहिले पुस्तक. पेंढारकरांच्या घरात एक मोठे ग्रंथालय होते. मी लहान असल्याने तेथील पुस्तके घेऊन फाडेन की काय, अशी भीती इतरांनी असे. परंतु मला पुस्तके मनापासून आवडायची. त्यामुळे बाबा दासबोध वाचताना मी दररोज त्यांच्यासमोर बसून शांतपणे ऐकायचे. तर साताऱ्यातील समर्थ सदन हे माझे खरे बलस्थान. तेथील सेवा मंडळाच्या ग्रंथालयात देखील मला कधीही कोणी हटकले नाही. त्या काळी लहान मुलांसाठी वेगळे आध्यात्मिक लिखाण होत होते, हे तेथील ग्रंथसंपदेवरून समजते. त्या वेळी आध्यात्मिक पुस्तकांप्रमाणेच चरित्रात्मक पुस्तकेही वाचनात आली. पुस्तक वाचले की सज्जनगडावरची बुंदी मिळायची, हाही मोहाचा भाग होता. जे वाचन केले त्याचा सारांश लिहून काढायचा, त्यामुळे लेखनाची सवयही लहानपणापासूनच लागली. तेव्हा पुस्तकांच्या जगात वावरणारे प्राणी म्हणून आमची ओळख निर्माण झाली होती. सज्जनगडचे तत्कालीन मठपती अण्णाबुवा कालगांवकर आणि कुलकर्णीबुवा या दोन व्यक्तींना माझ्या आयुष्यात पितृतुल्य स्थान आहे. त्यांचा माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. माझे इंग्रजी चांगले असल्याने पुढे त्यांनीच मला सेंट पॉल स्कूल येथे नोकरीला लावले. त्या वेळी ‘हू मूव्हड् माय चीज’ या चार उंदरांच्या ललित कथेवरील पुस्तक तेथील फादर यांनी मला भेट दिले. माझ्या पहिल्या पगारासोबत मिळालेली ही पुस्तकाची पहिली भेट असावी. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी सातारा-पुणे असा प्रवास सुरू झाला आणि प्रवासादरम्यान आध्यात्मिक पुस्तके आणि शैक्षणिक पुस्तकांचा अभ्यास सुरू झाला. एसटीतील वाहक मला त्यासाठी रात्री गाडीतील दिवा लावून देत असत. यामुळे वाचनाकरिता कधीही, कुठेही मला अडथळा निर्माण झाला नाही, हेही तितकेच खरे आहे. माझी आई घरी आल्यानंतर रोज गुरुचरित्र पारायण करीत असे, त्यामुळे ते शब्द कानावर पडून माझ्यावर नकळत चांगले संस्कार होत गेले. सेंट पॉल स्कूलमधील नोकरीनंतर पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी धर्मश्री प्रकाशनमध्ये मिळाली, त्यामुळे येथे पूर्ण वेळ कामाकरिता १९९२ मध्ये मी पुण्यात आले. एका मोठय़ा प्रकाशन संस्थेत कामाला सुरुवात झाली असल्याने वाचनाचा आवाका वाढविण्याची आवश्यकता होती. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ह. वि. दाते यांच्या पुस्तकाने मला वेगळे धडे दिले. त्यांचे सूर्यनमस्कार हे पुस्तक िहदीत साकारायची जबाबदारी धर्मश्री प्रकाशनातर्फे माझ्याकडे होती. त्या वेळी वासुदेव घाणेकरांकडून अनुवाद करून िहदीमध्ये पुस्तक साकारण्याचे काम दीड वर्षांच्या कालावधीत मी पूर्ण केले. कालांतराने धर्मश्रीमधील नोकरी सोडून मी पुढील कामाच्या शोधात बाहेर पडले आणि ज्ञान प्रबोधिनीतील विश्वनाथ गुर्जर यांच्याशी परिचय झाला. त्यांनी केलेल्या आíथक मदतीमुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकले. सिम्बायोसिसमध्ये इंग्रजीचे धडे घेताना सोबत असलेल्या गुजराती आणि मारवाडी विद्यार्थ्यांमुळे मला काही प्रमाणात या भाषांचीही गोडी लागली. त्यामुळे पुढे नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानंतर या भाषा आणि त्यासंबंधी वाचलेले साहित्य मला उपयोगी पडले. परंतु त्याच काळात अचानक आलेल्या घरगुती अडचणीमुळे मला पुन्हा घराकडे लक्ष द्यावे लागले. आíथक अडचणी मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्या आणि त्याच वेळी मला ज्ञान प्रबोधिनीने पुन्हा मदतीचा हात आणि आधार दिला. त्यांनी दिलेल्या एका पत्रामुळे मला बँकेमधून ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले आणि १९९९ पासून मी माझ्या लहान बहिणीसह भानुविलास चित्रपटगृहाच्या परिसरात मिळेल ती स्टेशनरी प्रिटिंगची कामे घेण्यास सुरुवात केली. विद्यापीठात कामासंबंधी गेले असताना गुजराती पुस्तकांविषयी काम करण्याची संधी मिळत होती. त्यामुळे एका गुजराती शिकविणाऱ्या शिक्षिकेला आठवडय़ाला दोनशे रुपये शुल्क देऊन गुजराती भाषेचे धडे मी घेतले आणि अमराठी भाषांमधील पुस्तकांची कामे मिळवायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. समर्थ रामदासकृत ‘दखनी-उर्दू पदावल्या’, मोडी संशोधनावर ‘एक होता बाळंभट’ ही मी लिहिलेली पुस्तके माझ्यासाठी लाख मोलाची आहेत. दरम्यान, याकामी मिळालेल्या सहकार्याबद्दल ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करीत या उंचीपर्यंत पोहोचताना मला विविध भाषा आणि पुस्तकांनी साथ दिली होती. त्यामुळेच प्रत्येक गोष्ट कृतीतून दाखविण्याचा मी प्रयत्न मी करू शकले. मराठी ही थोडी क्लिष्ट भाषा असून इतर भाषा त्यामानाने अतिशय सोप्या आहेत. त्यामुळे इतर भाषांचा अभ्यास करताना तंजावर, मध्य प्रदेश, वडोदरा, दिल्ली सारख्या ठिकाणी जाणे होत असे. तेथे गेल्यावर मराठी आणि अमराठी पुस्तकांची खरेदी मी मोठय़ा प्रमाणात केली. माझ्या संग्रहात आजमितीस सहा राज्यांमधील नऊ भाषांतील ५० कोश आहेत. तर व्याकरणाची दीडशेहून अधिक पुस्तके आहेत. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, बंगालसह मराठय़ांचा इतिहास ही पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ज्ञान प्रबोधिनी, पुणे नगर वाचन मंदिर, विश्रामबाग ग्रंथालय, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथील ग्रंथालयांसह पी. ए. इनामदार ग्रंथालय हे उर्दू साहित्याकरिता मला खूप उपयोगी ठरले. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद करताना समर्थ रामदासांसह अनेक सद्पुरुषांवरील साहित्य मी ढुंढाळले. प्रत्येक शतकातील साहित्य शोधून भारत आणि स्थानिक भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतातील सद्पुरुषांचे विचार आणि मराठीसह आपल्याच मातृभूमीवरील इतर भाषांचा प्रसार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याकरिता माझे प्रयत्न आजही सुरूच आहेत.