देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान समारंभ ‘स्वातंत्र्यानंतर पत्रकारिता ही एक व्यावसायिक वृत्ती बनली आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये अहंकार निर्माण झाला, जो देशाला हानिकारक आहे. अहंकार माध्यमांना शोभा देत नाही. त्यामुळे माध्यमांनी मनोवृत्ती बदलणे गरजेचे बनले आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी शनिवारी केले. देवर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र आणि आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राम माधव बोलत होते. कार्यक्रमात दिलीप धारुरकर यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, मुस्तफा आतार यांना युवा पत्रकार पुरस्कार, गणेश कोरे यांना छायाचित्रकार पुरस्कार आणि शेफाली वैद्य यांना सोशल मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अजित पटवर्धन होते. मनोहर कुलकर्णी, फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र परदेशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राम माधव म्हणाले, सत्य हे पवित्रच राहिले पाहिजे, त्यात कोणताही हस्तक्षेप नसावा. पत्रकारितेचा सन्मान टिकला पाहिजे आणि पत्रकारितेत विनम्रताही असणे आवश्यक असून माध्यमांवर आलेली जबाबदारी माध्यमांनी प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबद्दल ते म्हणाले की, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे. तेथील नागरिकांची सरकारला पूर्ण काळजी आहे. काश्मिरींच्या हितासाठी तसेच तेथे शांतता नांदावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काश्मिरींनाही त्यांचे हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी घटनेच्या कक्षेत राहूनच हक्क मागावेत. मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि दीपा भंडारे यांनी सूत्रसंचालन केले.