शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. ते सोमवारी पुण्यात बोलत होते.  सध्या मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी कोणाचा पाठिंबा घ्यायचा, यावरून शिवसेनेत खलबते सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले. शिवसेनेने राज्य सरकाराचा पाठिंबा काढण्याची तयारी दाखविल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक अविश्वासदर्शक ठराव मांडू शकतात. मात्र, शिवसेनेशिवाय हा ठराव मांडता येणे शक्य नाही. अविश्वासदर्शक ठरावासाठी पुरेसे संख्याबळ लागते. त्यामुळे शिवसेना आमच्याबरोबर आली तरच हे शक्य आहे. मात्र, शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जवळपास समान जागा मिळाल्यानंतर, महापौरपदासाठी वेगवेगळी गणिते मांडण्याचे प्रयत्न होत असताना या दोन्ही पक्षांतील दरी आणखी वाढवून भाजपची कोंडी करण्याची रणनिती विरोधी पक्षांनी आखली आहे. मुंबईत महापौरपदासाठी भाजपला मदत करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, शिवसेनेला मात्र अप्रत्यक्षरीत्या मदत पुरवण्यात येऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असून, त्यामुळे आता पुढे कुठली समीकरणे उदयास येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, उभय पक्षांतील वाद वाढायला नको, म्हणून राज्य मंत्रिमंडळाची उद्या, मंगळवारी होणारी बैठकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याचे कळते.

पुढील सोमवारी, ६ मार्च रोजी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, भाजप-सेनेतील दरी वाढवण्यासाठी ही वेळ उत्तम असल्याचे विरोधक मानत आहेत. महापौरपदासाठी काँग्रेस शिवसेनेस मदत करू शकते, अशी चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ज्यांना काँग्रेसबरोबर जायचे त्यांनी जावे, अशी भूमिका मांडलेली आहे. या पार्श्वभूमीवर, महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणे किंवा स्वतंत्र उमेदवार उभा करणे अशा पर्यायांवर काँग्रेस विचार करीत आहे. काँग्रेसचे ३१, तर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. हे ४० सदस्य तटस्थ राहिले, किंवा त्यांनी मिळून स्वतंत्र उमेदवार उभा केला तर त्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, एमआयएम अशी सगळ्यांची मिळून ४८ मते स्वतंत्र उमेदवार उभा करून एका अर्थी फुकट घालवायची म्हणजे शिवसेनेला त्याचा लाभ मिळेल, असे हे गणित आहे.