‘एनडीए’च्या गुणवंत विद्यार्थ्यांची भावना तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाला. लष्कराच्या वेगवेगळ्या दलामध्ये सामील होत भावी आयुष्य देशसेवेचे काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३२ व्या तुकडीतील गुणवंत छात्रांनी मोठय़ा अभिमानाने सोमवारी ही भावना बोलून दाखविली. प्रबोधिनीच्या १३२ व्या तुकडीतील बी.एस्सी. पदवी सर्वाधिक गुणांनी संपादन करणारा आकाश के. आर, बी.एस्सी. कॉप्म्युटर सायन्समध्ये प्रथम आलेला आदित्य निखरा आणि कला शाखेत सर्वप्रथम आलेला देवेंद्र कुमार या तिघांनी पदवी स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आजोबा आणि वडील यांच्या पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र लष्करामध्ये दाखल होणारा तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. तर, कोणतीही लष्करी पाश्र्वभूमी नसलेल्या आकाश आणि आदित्य या दोघांनी प्रशिक्षणानंतर आमच्यामध्ये कणखरपणा आला असल्याचे सांगितले. देवेंद्र कुमार म्हणाला, मला कळायला लागले तेव्हापासून मला फक्त लष्करामध्ये यायचे आणि देशसेवा करायची हेच एक ध्येय होते. बाराव्या वर्षी मी मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. हे शिक्षण झाल्यावर मी केवळ एनडीएसाठीच अर्ज केला. माझे आजोबा आणि वडील हे देखील लष्करामध्ये होते. ऑनररी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झालेल्या माझ्या आजोबांना ही पदवी अर्पण करतो. देशसेवेसाठी जे करायला हवे ते करायची माझी तयारी आहे. गेले तीन वर्षे जी कठोर मेहनत घेतली त्याचे चीज करण्याची वेळ आली आहे. माझे तीन काका देखील लष्करी सेवेमध्येच आहेत. केरळमधील त्रिवेंद्रम येथील आकाश ए. आर. याने लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्याचे ठरविले आहे. त्याचे वडील शासकीय विधी महाविद्यालयामध्ये प्राचार्य असून आई पशुवैद्यक आहे. बारावीनंतर मी प्रबोधिनीमध्ये आलो. माझे सर्वागीण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे श्रेय मी प्रबोधिनीलाच देईन. मूल्यसंस्कार घडविणाऱ्या प्रबोधिनीने माझ्यामध्ये कणखरपणा भिनविला आहे, असे तो म्हणाला. मध्य प्रदेशातील निवारी येथील आदित्य निखरा याने मला बालपणापासून रडगाडय़ांचे आकर्षण होते आणि त्यातूनच प्रबोधिनीत प्रवेश घेतल्याचे सांगितले. या तीन वर्षांत मी मनाने कणखर झालो असून एक अवखळ मुलगा ते जबाबदार व्यक्ती असे माझे व्यक्तिमत्त्व घडले आहे, असे सांगितले. आदित्यच्या वडिलांचा गारमेंटचा व्यवसाय असून आई शिक्षिका आहे. माझ्या वडिलांना लष्करामध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्या वेळी त्यांना शक्य झाले नाही. ही त्यांची इच्छा आता माझ्या माध्यमातून पूर्ण झाली असल्याचे आदित्य म्हणाला.