ज्यांच्यापर्यंत दीपोत्सवाचा प्रकाश पोहाचू शकत नाही, अशी असंख्य मुले आपल्या आजूबाजूला आहेत. आजही ते दुर्लक्षितांचे जीवन जगत आहेत. अशा मुलांच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा प्रकाशमान व्हावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर यांनी व्यक्त केली. अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्यातर्फे एकलव्य बालशिक्षण संस्थेतील ८० मुलांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेतील मुलांना दिवाळी फराळ, सुगंधी उटणे आणि आकाशकंदील भेट देण्यात आले. रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, अभिनेते प्रवीण तरडे, विजय पटवर्धन, अससुल कासवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव, प्रकाश ढमढेरे, क्लबचे संतोष पटवा, प्रकाश गायकवाड, श्याम मानकर, रवींद्र माळवदकर या वेळी उपस्थित होते. संस्थेतील मुलांनी नृत्यसादरीकरण केले. गावस्कर म्हणाल्या, उपेक्षित मुलांच्या जीवनातील प्रत्येक दिवस दिवाळी असायला हवा. या मुलांसाठी उपक्रम राबवितो, तेव्हा समाजातील काही मुलांपर्यंतच आपण पोहोचतो. दुसऱ्यांबरोबर केलेली दिवाळी ही अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण असते. अशी संधी आपल्याला लहान मुलेच देत असतात. या मुलांचे आनंदी चेहरे दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत आपण उत्सवाचा आनंद साजरा करायला हवा. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. माधवी सावरकर यांनी सूत्रसंचालन केले.