प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे आता नवीन तंत्रज्ञान वापरून रोपवाटिकांची निर्मिती केली जाणार आहे. यात रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी ‘रूट ट्रेनर’ पद्धत वापरणे, रोपांना ठरावीक तापमान मिळावे यासाठी ‘मिस्ट चेंबर’चा तसेच हरितगृहांचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. पुढील पावसाळ्यात लावण्याच्या रोपांची निर्मिती ऑक्टोबर- नोंव्हेंबरमध्ये सुरू होत असून लवकरच योजनेचे काम सुरू होऊ शकेल, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागातर्फे देण्यात आली. शासनातर्फे केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणासाठी तात्पुरत्या स्वरूपात रोपे तयार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी रोपवाटिका चालवल्या जातात. आता ६ महसूल विभागांच्या स्तरांवर तसेच प्रत्येक तालुक्यात एक यानुसार राज्यात ३५६ रोपवाटिका नवीन तंत्रज्ञान वापरून चालवल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात आता असलेल्या रोपवाटिकांचे नूतनीकरण केले जाणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे प्रसिद्धी अधिकारी आर. आर. कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, ‘पूर्वी आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपे तयार करत होते. आता ती ‘रूट ट्रेनर’ या प्लास्टिकच्या ट्रेसारख्या आवरणात तयार केली जातील. वजन कमी असल्यामुळे त्याच्या वाहतुकीचा खर्च कमी येतो व उंच ठिकाणी वृक्षारोपणासाठी एका वेळी अधिक रोपे नेता येतात. काही रोपांना ठरावीक तापमानातच ठेवावे लागते, तसेच काही रोपे वालुकामय जमिनीत वाढतात या गोष्टींसाठी ‘मिस्ट चेंबर’ उपयोगी पडेल.’ रोपे ठेवण्यासाठी आणि ठरावीक रोपांना विशिष्ट कालावधीसाठी ऊन व सावली देण्यासाठी बांबूचे ‘पॉली हाऊस’ व हरितगृहांच्या वापराबरोबर गांडूळ खतनिर्मिती, रोपांना पाणी देण्यासाठी सिंचनपद्धतीचा वापर या गोष्टीही रोपवाटिकांमध्ये होणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. या योजनेसाठी २०१५-१६ या वर्षी १,८७० लक्ष इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.