हिरवी मिरची, कोबी, गाजर महागले गुलटेकडीतील छत्रपती श्री शिवाजी मार्केट यार्डात आवक वाढल्याने भेंडी, गवार, टोमॅटो, दुधी भोपळा या भाजीपाल्यांच्या दरात घट झाली. मागणी वाढल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गाजर, श्रावणी घेवडय़ाच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून १७० ते १८० गाडय़ा भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यातून हिमाचल प्रदेशातून तीन ट्रक मटार, गुजरात, कर्नाटकातून चार ते पाच ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून पाच ते सहा टेम्पो शेवगा, ओरिसा, दिल्ली, कर्नाटकातून दहा ते बारा टेम्पो शेवगा, कर्नाटकातून सात ते आठ टेम्पो तोतापुरी कैरी अशी आवक झाली. सातारी आले बाराशे ते चौदाशे पोती, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर चौदा ते पंधरा टेम्पो, शेवगा पाच ते सहा टेम्पो, ढोबळी मिरची दहा ते बारा टेम्पो, चिंच तीस ते चाळीस पोती, गावरान कैरी आठ ते दहा टेम्पो, गाजर पाच ते सहा टेम्पो, तांबडा भोपळा दहा ते बारा टेम्पो, कांदा शंभर ट्रक अशी आवक स्थानिक भागातून झाल्याची माहिती प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली. आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागातून चाळीस ते पन्नास ट्रक बटाटा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून पाच ते साडेपाच हजार गोणी लिंबांची आवक झाली. लिंबू, पपईच्या भावात घट; संत्र्याचे भाव वाढले उन्हाळ्यामुळे लिंबांना रसवंतीगृहचालक आणि सरबतविक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे. आवक होणाऱ्या लिंबांमध्ये हिरव्या लिंबांचे प्रमाण जास्त आहे. हिरव्या लिंबांना फारशी मागणी नसते. त्यामुळे लिंबांच्या दरात गोणीमागे पन्नास ते शंभर रुपयांनी घट झाली आहे, अशी माहिती लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. पपईच्या भावात प्रतिकिलोमागे दोन ते तीन रुपयांनी घट झाली आहे. संत्र्यांच्या भावात वाढ झाली असून फळबाजारात पंधरा टन संत्र्यांची आवक रविवारी झाली. केरळहून अननस आठ ट्रक, मोसंबी पन्नास टन, पपई दहा ते बारा टेम्पो, चिक्कू दोन हजार गोणी, खरबूज पंचवीस ते तीस टेम्पो, सफरचंद एक ते दीड हजार पेटी अशी आवक फळबाजारात झाली. पालेभाज्यांचे दर स्थिर भाजीपाला बाजारात कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुडय़ांची आवक झाली. मेथीच्या पन्नास हजार जुडय़ांची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत.