एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला होता. परंतू, याचा तिळमात्र परिणाम संपावर किंवा एसटी कर्मचाऱ्यांवर झालेला नाही, आज त्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आज परिस्थिती जैसे थे आहे. काही वयोवृद्ध आणि तरुण मंडळी सकाळपासूनच संप मिटेल या आशेने पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर बस स्थानकात ठाण मांडून बसले आहेत. मात्र, संप काही अजून मिटलेला नाही. दरम्यान, राजेंद्र सांगोळे (वय ७५) आणि त्यांच्या पत्नी सरूबाई सांगोळे (वय ७०) हे उस्मानाबादेतील येरमाळा येथील रहिवासी असून मुलाला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडला आले आहेत. आज त्यांना दिवाळीसाठी गावी परत जायचे असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून बस स्थानकात गाडी सुटण्याची वाट पाहत आहेत. त्यांना एसटी कर्मचाऱ्याचा संप आहे हे माहीत होतं. परंतू, संप मिटेल या आशेने येथे आलो आहोत, असे सांगोळे यांनी सांगितले. आमच्या काळात असं नागरिकांना कधी वेठीला धरले जात नव्हते. सरकार कुठलंही असो पण नागरिकांना विनाकारण त्रास नसला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी काँग्रेसच सरकार होत ते बरं होत. सध्या एसटी आणि सरकारच्या कचाट्यात सामान्य नागरिक सापडला आहे, हे योग्य नाही. याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर, महादेव सोनवणे हे प्रवाशी आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह एसटी स्थानकांत संप मिटण्याची वाट पाहात आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते वल्लभनगर बस स्थानकात बसले असून संप मिटण्याची वाट पाहत आहेत. दिवाळ सणासाठी गावाकडून फोन येत असल्याने तिकडे जाण्याची आम्ही तयारी केली. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची वाट पाहात आहोत, असे त्यांनी सांगितले. ज्या एसटी चालकाच्या हातात प्रवाशांची सुरक्षा आहे. त्यांच्या वेतनात वाढ व्हायलाच पाहिजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याना पाठींबा दर्शवला. तुम्ही खाजगी बसने का जात नाहीत? असा प्रश्न विचारला असता. खासगी बस चालकांवर आपला विश्वास नाही, एसटीचे चालक निर्व्यसनी असतात त्यामुळे एसटीनेच प्रवासाला आपले प्राधान्य असते. म्हणूनच गावी जायचे झाल्यास मी एसटीनेच जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.