ज्या व्यक्तींना अॅलर्जीचा त्रास आहे त्यांचा त्रास कबुतरे आणि पारव्यांच्या सातत्याने सान्निध्यात राहिल्यामुळे वाढण्याची शक्यता असल्याचा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागेत किंवा रस्त्यावर असलेल्या पाळीव कबुतरांच्या ढाबळी काढल्या जाव्यात असा निर्णय पालिकेने गुरूवारी घेतला. पारव्यांबाबत मात्र अद्याप पालिकेने काही धोरण निश्चित केलेले नाही.केवळ पक्ष्यांच्या घाणीमुळेच नव्हे, तर त्यात काही जंतू वाढून या गोष्टी नाकावाटे शरीरात गेल्यामुळेही अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग उपासनी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘ज्यांना मुळातच अॅलर्जीचा त्रास असतो त्यांची दम्याची प्रवृत्ती वेगवेगळ्या कारणांमुळे वाढू शकते. पक्ष्यांची घाण हे त्यातील एक कारण ठरु शकते. ही घाण कोरडी झाली की त्याचे कण हवेत उडू लागतात. ती श्वसनावाटे आत गेल्यास काहींना त्रास होतो. सुरूवातीला शिंका येणे, नाक वाहणे आणि नंतर घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. अनेकदा रुग्णांना आपल्याला कशाकशाची अॅलर्जी आहे हे माहीत नसते. अशा वेळी ते कोणत्या वातावरणात राहतात यासंबंधी त्यांना प्रश्न विचारले जातात.’’पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी म्हणाले, ‘‘कबुतरांच्या ढाबळींसाठी सध्या परवाना प्रक्रिया नाही, पण पक्षी पाळताना तो अधिकृत जागेत पाळणे आवश्यक आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या गच्चीवर असलेल्या पाळीव कबुतरांच्या अनधिकृत ढाबळी काढल्या जातील. सोसायटय़ांमध्ये अशा ढाबळी असतील तर त्यांना नोटिसा दिल्या जातील.’’ पारवे ढाबळींमध्ये पाळले जात नसले तरी त्यांची संख्याही मोठी असून त्यांना खाणे घालण्यात नागरिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील म्हणाले, ‘‘रस्त्यांवर किंवा बागेत पारव्यांना किंवा इतरही पक्ष्यांना खाणे घातले जाते. त्यावर बंधने आणणे आवश्यक आहे. जे नागरिक पारव्यांना खायला घाततात त्यांचा हेतू वाईट नसतो. पण अशा प्रकारे खाणे घातल्यामुळे एकाच प्रकारच्या पक्ष्याची संख्या त्या ठिकाणी खूप वाढते. झाडांमध्ये राहून पक्ष्यांना नैसर्गिकरित्या जे अन्न मिळते तेच मिळू देणे योग्य आहे. शहरातील बागा, टेकडय़ा, तळी आणि मोकळ्या जागा या ठिकाणी झाडा- झुडपांच्या स्थानिक जाती लावणेही त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. असे झाल्यास पारवे त्यावर अवलंबून राहू शकतील. अर्थात हा दीर्घ काळचा उपाय आहे. पक्ष्यांचे शहरातील मूळचे अधिवास जपणेही तितकेच गरजेचे आहे.’’ असा आहे कबुतरे आणि पुण्याचा संबंध!कबुतरे उडवण्याचा खेळ (पिजन रेसिंग) पुण्यात मोठय़ा प्रमाणावर खेळला जातो. केवळ शहरी भागात तब्बल ५०० ते ६०० जणांकडे स्वत:चे कबुतरांचे थवे आहेत. हा खेळ प्रामुख्याने थंडीत खेळला जात असून फेब्रुवारीपर्यंत त्याचा हंगाम चालतो, तसेच कबुतरे उडवण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात.