देशातीलच नव्हे तर आशियातील श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील ‘गरिबी’ समोर येत आहे. पालिकेतीलअधिकारी दिव्यांग नागरिकांना वेळ देत नसल्याचे समोर आले आहे. दिव्यांग नागरिकांनी आपल्या समस्येसाठी अधिकाऱ्यांडे दाद मागितल्यास त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग नागरिकांनी मंगळवारी महापालिका भवनामध्ये ठिय्या आंदोलन केले. प्रसारमाध्यमांनी दिव्यांगांची दखल घेतल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनंतर त्यांनी दिव्यांगाच्या ठिय्या आंदोलनाकडे धाव घेतली. दिव्यांग नागरीकांसाठी सरसकट दोन हजार रुपये पेन्शन, घरकूल योजना, अशा मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिक पालिकेतील अधिकाऱ्यांना वेळ मागत आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांना करायची आहे. अधिकारी दाद देत नसल्यामुळे अखेर या नागरिकांनी एकत्र जमून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

माध्यामांनी दिव्यांगांची दखल घेताच अधिकाऱ्यांनी दिव्यांगाना वेळ दिला. आयुक्तांशी बोलून बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून दिव्यांग नागरिकांना देण्यात आले. महापालिका भवनामध्ये अधिकारी दिव्यांग नागरिकांनाच जर अशी वागणूक देत असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.