पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांच्यात पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आयुक्त विश्वासात घेत नाहीत, आपण सांगितलेली कामे होत नाहीत, असा नाराजीचा सूर आळवण्यास महापौरांनी सुरुवात केली आहे. तथापि, महापौरांचा गैरसमज झाला असावा, अशी सारवासारव आयुक्त करताना दिसत आहेत.
महापौरपदाचा सन्मान राखला जात नाहीत, महापौरांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाहीत, अशी तक्रार महापौर धराडे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर, आयुक्तांनी नमते घेतले होते. आता पुन्हा एकदा महापौरांनी तोच सूर पुन्हा आळवला आहे. आपण सांगितलेली कामे आयुक्त करत नाहीत, आयुक्त पालिकेत येत नाहीत, त्याची कल्पना आपल्याला नसते. नागरिक, शिष्टमंडळे आयुक्तांकडील कामे घेऊन आपल्याकडे येतात, तेव्हा ते कार्यालयात उपलब्ध नसतात. आपल्याला कल्पना न देता ते निघून जातात, त्यामुळे आपण तोंडघशी पडण्याचे अनुभव घेतले आहेत, असे महापौरांचे म्हणणे आहे. तथापि, आयुक्तांना तसे वाटत नाही. महापौरपदाचा आपण सन्मानच करतो, मात्र, महापौरांचा काही तरी गैरसमज झाला असावा, अशी सारवासारव आयुक्त करतात.