महावितरण कंपनीने सेनापती बापट रस्त्यावर ‘प्रकाश भवन’ ही प्रशासकीय इमारत उभारली आहे. तिचे वैशिष्टय़ म्हणजे ही इमारत वीज वाचविते.. इमारतीत पुरेसा प्रकाश यावा व आतील वातावरण थंड रहावे, यासाठी काहीसी कल्पकता व आधुनिकतेचा संगम साधून ही इमारत उभारली आहे. या आगळ्या- वेगळ्या इमारतीमुळे शहरात विखुरलेली वीज कंपनीची काही कार्यालयेही एका छताखाली येऊ शकणार आहेत.इमारतीच्या प्रमुख वैशिष्टय़ांपैकी एक म्हणजे बांधकामासाठी ‘गोध्रा ब्रिक्स’ वापरण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा म्हणजे, इमारतीचा आतील भाग थंड राहतो व त्यामुळे वातानुकूलित यंत्रणेची आवश्यकता लागत नाही. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या इमारतीत बसविण्यासाठी खास शांघाय येथून ‘सोला स्क्रीन’ काचा आणण्यात आल्या आहेत. इमारतीच्या वरील भागातही या काचा बसविण्यात आल्या आहेत. या काचांमुळे इमारतीच्या आतील भागात पुरेसा उजेड राहतो व हवाही खेळती राहण्यास मदत होते. या दोन गोष्टीमुळे इतर इमारतींच्या तुलनेत या इमारतीसाठी कमी वीज लागणार असल्यानेच ही वीज वाचविणारी इमारत ठरणार आहे.पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने इमारतीच्या जागेवर असलेल्या जुन्या झाडांचे विस्थापन करून त्यांचे इमारतीच्या आवारात पुनरेपन करण्यात आले आहे. एकूण ७५ हजार चौरस फुटाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या इमारतीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. इमारतीचे उद्घाटन नुकतेच शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वीज वाचविणाऱ्या या इमारतीबाबत पवार यांनीही महावितरणचे कौतुक केले.ग्राहकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी गोष्ट म्हणजे विविध कार्यालये या इमारतीमुळे एका छताखाली येऊ शकणार आहेत. गणेशखिंड शहर मंडल कार्यालय या इमारतीत येणार असल्याने शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी व कोथरुडच्या ग्राहकांची सोय होणार आहे. प्रादेशिक कार्यालयही येथे येणार आहे. ‘महानिर्मिती’ची अधीक्षक अभियंता, कार्यकारी संचालक, गणेशखिंड मंडळ अधीक्षक अभियंता, शिवाजीनगर विभाग कार्यकारी अभियंता आदी कार्यालये या इमारतीत येणार आहेत. त्याचप्रमाणे सध्याच्या प्रशिक्षण केंद्राची जागा अपुरी होती, हे केंद्रही आता या इमारतीच्या प्रशस्त जागेत येणार आहे.