मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती पूर्वी जेवढे उत्तरपत्रिकेत लिहिले तेवढेच गुण मिळायचे, आता वेगळेच झाले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: मिळवलेल्या गुणांपेक्षा त्यांना अधिक गुण मिळत आहेत. सर्वानाच ९५-१०० टक्के गुण मिळत असून आपला पाल्य उत्कृष्टच आहे, अशी पालकांची धारणा होत आहे. त्यामुळे अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या गुणांचा फुगवटा बंद केला जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सांगितले. खरे गुण मिळणे महत्त्वाचे असून त्याची जाणीव पाल्य आणि पालक दोघांना असणे गरजेचे आहे, असेही जावडेकर म्हणाले. पुणे येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळय़ाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिवसभर काम करून रात्रशाळा, महाविद्यालयात अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आज आलो आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, परिस्थितीने गांजलेल्या पालकांची आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे अशी एकच इच्छा असते. त्यामुळे चांगले आणि सर्वाना शिक्षण देण्याचे सरकारचे धोरण आहे. महाग म्हणजेच चांगले शिक्षण अशी पालकांची धारणा झाली असून ती अत्यंत चुकीची आहे. शिक्षणक्षेत्रात अनेक अपप्रवृत्ती आल्या असून त्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. जिद्दीने शिकण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिवसभर काम करून रात्र शाळेत शिकताना, अभ्यास करताना काय अडचणी येतात, बिकट परिस्थितीवर कशी मात केली, शिकून पुढे काय बनायचे आहे, असे विविध प्रश्न विचारत कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर बसून प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिद्दीने शिका, परिस्थितीशी झगडणाऱ्यांना समाजाची साथ मिळतेच, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.