मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली काय चाललंय प्रभागात ? प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी भारतीय जनता पक्ष-शिवसेना एकत्र लढल्यास यश आणि स्वतंत्र लढल्यास पराभव हे चित्र महापालिकेच्या गेल्या तीन निवडणुकीत आणि गेल्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जुन्या कोंढवा प्रभागात दिसून आले होते. नव्याने झालेल्या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (प्रभाग क्रमांक ४१) मध्येही हेच चित्र कायम आहे. मात्र भाजप आणि शिवसेना युतीबाबतची अनिश्चितता, अंतर्गत वाद आणि वाढता विसंवाद लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रभागात वर्चस्व सिद्ध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करण्याच्या हालचालीही येथे सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीवरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची व्यूहरचनाही अवलंबून राहणार आहे. महापालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावाच्या समावेशाने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागामध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे प्राबल्य राहिले आहे. गत तीन निवडणुकांमध्ये या भागातून युतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेचा सध्याचा प्रभाग क्रमांक ६२ म्हणजे कोंढवा बुद्रुक, कात्रज-सुखसागरनगरचा परिसर (प्रभाग क्रमांक ७६) मिळून नव्याने हा प्रभाग झाला आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, माउलीनगर, गुजर वस्ती, शिवशंभो नगर, स्वामी समर्थनगर, विद्यानगर, आनंदनगर आणि सुखसागर नगरचा अर्धा भाग यात समाविष्ट आहे. सन २००२ मध्ये त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीत या प्रभागात शिवसेनेच्या दोघांचा तर भाजपच्या एकाचा विजय झाला होता. सन २००७ मध्ये एकदस्यीय पद्धतीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली होती. तर २०१२ मध्ये भाजपचा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. सन २००२ पासूनच्या निवडणुका या माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेल्या. पुढे २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबर हे हडपसर मतदारसंघातून विजयी झाले. यानंतर नेतृत्वावरून बाबर आणि भाजपचे नगरसेवक तसेच विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यामधील विसंवाद वाढला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यामध्ये टिळेकर विजयी झाले. सध्या या दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद वाढले होते. त्यामुळे कोंढवा येथील पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार पराभूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे उमेदवार रईस सुंडके विजयी झाले. त्यामुळे कोंढवा परिसरात भाजप-सेनेला रोखायचे असेल, तर कोंढवा खुर्दमधील व्यूहरचनाच या प्रभागासाठी वापरण्याचा अभ्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाला आहे. या प्रभागातील एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून एक जागा ओबीसी वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. उर्वरित दोन जागांपैकी एक जागा सर्वसाधारण गटातील महिलेसाठी तर एक जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही स्थानिक पातळीवर सोबत घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप-सेना युती न झाल्यास ही व्यूहरचना यशस्वी ठरेल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजप-सेनेची युती होणार की नाही, याकडेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे. अविनाश कवठकेर, पुणे