रामदेव बाबा योगगुरू असले तरी आज ते घराघरात प्रसिद्ध आहेत ते पतंजलीच्या विविध उत्पादनांमुळे. मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गीयांपर्यंत सारेचजण पतंजलीच्या विविध उत्पादनांच्या प्रेमात असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अनेक शहरांमध्ये पतंजलीची विविध उत्पादने विकत घेण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्याचे चित्र आहे. हे सर्व दिसत असतानाच रामदेव बाबा यांनीही पतंजलीच्या उत्पादनांमुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांची झोप उडाली असल्याचे म्हटले आहे. पतंजलीची लोकप्रियता वाढत असतानाच रामदेव बाबा यांनी थेट बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच निशाणा साधलाय. कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी इथे तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी आलेली नाही. त्यांना आपल्या देशाशी काहीही देणेघेणे नाही. ते फक्त इथं नफा कमावण्यासाठी आले आहेत. भारतात येताना ते केवळ एक रुपया घेऊन आले होते. पण येथून १०० रुपये घेऊन जात आहेत. त्यांनी आतापर्यंत देशाच्या कोणत्याही विकासकामांना हातभार लावला नाही. आतापर्यंत ते लाखो कोटी रुपये भारतातून घेऊन गेले आहेत. पण या सगळ्यांना पतंजलीच्या उत्पादनांनी चांगलीच टक्कर दिलीये. त्यामुळेच त्यांच्या प्रमुखांची झोप उडाली असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. परदेशातून गुंतवणूक मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशात गेले. तेथून किती गुंतवणूक भारतात आली, ते तुम्ही पाहिलेच. त्यामुळेच मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन अखेर देशातूनच मोठ्या प्रमाणात निधी बॅंकिंग व्यवस्थेत आणला, असेही त्यांनी सांगितले. पुण्यातील छात्र संसदेच्या कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी ही माहिती दिली. पतंजलीची उत्पादने लवकरच बांगलादेश आणि आफ्रिकेमध्ये नेण्यात येणार असून, एक दिवस ती नक्कीच पाकिस्तानातही नेण्यात येतील, असेही रामदेव बाबा म्हणाले. या देशांमधून पतंजली जितका नफा कमावेल. तो सर्व भारतातील गरिबांच्या कल्याणासाठी वापरण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत पतंजलीने एक लाख लोकांना रोजगार दिला. पाकिस्तानमधील गरिबी दूर झाल्यास भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व कायमचे संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तान भारताशी युद्धाचा विचार करणार नाही, असे यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले.