परवान्यांसाठी अर्ज करण्याचे ‘आरटीओ’चे आवाहन रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या दृष्टीने परवाना देण्याबाबत असलेले नियंत्रण राज्य शासनाने काढून घेतल्याने रिक्षाचे नवे परवाने खुले होऊ शकणार आहे. या निर्णयाचे रिक्षा संघटनांकडून स्वागत करण्यात आले असले, तरी शहराच्या वाढत्या वाहनांच्या संख्येत आणखी रिक्षांची भर पडणार असल्याने त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या धोरणानुसार रिक्षा परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्षा किंवा टॅक्सीचे परवाने देण्याबाबत पूर्वी शासनाचे धोरण होते. नोव्हेंबर १९९७ मध्ये नवे परवाने देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यानंतर केवळ बाद झालेले परवानेच इतरांच्या नावे देण्यात आले. रिक्षा परवाने खुले करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून अनेकदा करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन आणि बॅजधारकांना परवाना मिळण्याच्या दृष्टीने रिक्षाच्या परवान्यावरील मर्यादा काढून काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यासह, मुंबई, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद येथे रिक्षाचे नवे परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अनेक वर्षे बॅज काढून रिक्षा परवान्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना त्यामुळे परवाने उपलब्ध होऊ शकणार असल्याने रिक्षा संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरात मानसी एक वाहन रस्त्यावर धावते आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतो आहे. शहरामध्ये रिक्षांची संख्या सुमारे ४५ हजारांहून अधिक आहे. बेकायदा धावणाऱ्या रिक्षाही शहर आणि उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे नव्या रिक्षांच्या परवान्याबाबत शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊनच रिक्षांचे परवाने देण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे. ओला, उबेरच्या वाहनांतही वाढ ओला, उबेरसारख्या मोबाइल अॅपवर चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला शासनाने मुंबईत अधिकृत मान्यता दिली असली, तरी पुण्यामध्ये अद्याप तरी या वाहनांची सेवा अधिकृत नाही. मात्र, त्याला नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता याबाबत शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये या वाहनांची संख्याही रस्त्यावर वाढत चालली आहे. रिक्षा आणि ओला, उबेर यांच्यात थेट स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, याही वाहनांच्या संख्येवर मर्यादा हवी, असे मत व्यक्त केले जात आहे. रिक्षा परवान्याची प्रक्रिया सुरू शासनाच्या नव्या धोरणानुसार रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जासोबत वाहन चालविण्याचा परवाना, बॅज, राहण्याच्या पत्त्याचा पुरावा, नामनिर्देश प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, रहिवासी दाखला, स्वयंघोषणा पत्र, तीन छायाचित्रे, शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. परवाना शुल्क एक हजार आणि अतिरिक्त परवाना शुल्क दहा हजार रुपये भरणे बंधनकारक आहे. २०१४ आणि २०१६ मधील प्रतीक्षा यादीतील अर्जदारही आता अर्ज करू शकतात. या कामासाठी कोणतीही संख्या, व्यक्तीला नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.