आयुक्ताचा अहवाल समाधानकारक नसल्याने पुन्हा माहिती देण्याचे नगरविकास विभागाचे आदेश समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या साठवणूक टाक्यांच्या कामांबाबत नगरविकास विभागाकडून महापालिकेकडून पुन्हा नव्याने काही माहिती मागविण्यात आली आहे. साठवणूक टाक्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत ही माहिती असून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिलेला अहवाल असमाधानकारक असल्याचेही त्यातून स्पष्ट होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविधि ठिकाणी ८२ साठवणूक टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम वादात सापडले होते. प्रारंभी या कामासाठी स्वतंत्र पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविली होती. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही प्रक्रिया परस्पर रद्द करून ‘एल अॅण्ड टी’ या कंपनीला हे काम दिले होते. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. तर काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ आणि विधानपरिषदेतील आमदार अनिल भोसले यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर या कामांना स्थगिती दिल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केले होते. तसे आदेशही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मिळाले होते. काम स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे या कामांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्रयस्थ संस्थेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून होत असतानाच या प्रकरणाचा अहवाल महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य शासनाला दिला होता. मात्र हा अहवाल आल्यानंतरही नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नव्याने माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थगिती उठणार? दहा मार्चपासून काम बंद असल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरे जावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला स्थगिती उठविण्याची सूचना केल्याची माहिती महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यानुसार मे महिन्यात या कामाला पुन्हा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.