या देशाला स्वातंत्र्यापूर्वी सर्व राज्यकर्ते असंस्कृत लाभले आणि स्वातंत्र्यानंतरही आजपर्यंत तीच परंपरा कायम राहिली, अशी टीका अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी निगडीत बोलताना केली. प्राधिकरणातील जयहिंदू मित्र मंडळाच्या व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. या वेळी माजी महापौर आर. एस. कुमार, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेविका नंदा ताकवणे, भारती फरांदे, मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके आदी उपस्थित होते. गांधींबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. मात्र, त्यांनी चुकीच्या अनेक गोष्टी केल्या, त्याचे समर्थन करता येणार नाही, असे सांगून पोंक्षे म्हणाले, उपोषण हे सुसंस्कृत राज्यकर्त्यांसमोर उपसण्याचे शस्त्र आहे, असंस्कृत राज्यकर्त्यांसमोर त्याचा काही उपयोग होणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही या देशाला असंस्कृत राज्यकर्तेच मिळाले. गांधींचे कोणतेही उपोषण यशस्वी झाले नाही, तेच अण्णा हजारे यांच्याबाबतीत झाले. या उपोषणकर्त्यांची महापंचाईत झाल्याचे अनेकदा दिसून येते. तीन-चार दिवस ते कसेतरी काढतात. कॅमेरे समोरच असल्याने चोरून काही खाता-पिता येत नाही. असंस्कृत राज्यकर्ता आपल्याला विचारातच घेत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर मरणाची भीती दिसू लागते, उपोषणाचा मुखवटा गळून पडतो. मग, जवळच्या कोणाला तरी सांगून वेळप्रसंगी खोटे आश्वासन देऊन उषोषण सोडवण्याचे नाटक करावे लागते. मग ‘लोकपाल’चे आश्वासन मिळते, उपोषण सुटते. प्रत्यक्षात सर्व काही ‘जैसे थे’ असते. याचे कारण राज्यकर्ता असंस्कृत असतो. अिहसेचे समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.