पिंपरी-चिंचवड महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. शिक्षण मंत्री विनोद तावडे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत रविवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजात राजकीय अस्पृश्यता वाढताना दिसत असून ही दुर्दैवाची बाब आहे, असे मत बापट यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्राचे अनावरण असल्यानं सत्ताधारी भाजपने ठाकरे कुटुंबीय अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला आमंत्रण देणं अपेक्षित होते. मात्र, भाजपनं श्रेय लाटण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते अनावरण करण्याची घोषणा केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. तर ठाकरे कुटुंबियांना अथवा वरिष्ठ नेत्याला बोलावण्याची मागणी शिवसेने उशीरा केल्याच कारण भाजपने पुढे केले होते. रविवारी सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण भाजपच्या नेत्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. सावरकर हे आयुष्यभर अस्पृश्यतेच्या विरोधात लढले. भविष्यात राजकीय अस्पृश्यता बाजूला करण्याची वेळ आपल्यावर येणार आहे, असे बापट यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी अनेक कार्यक्रमाला जातो. कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार मी कधीच करत नाही. कारण तो त्या भागाचा त्या पक्षाचा नेता असतो. राजकीय अस्पृश्यता समाजात वाढू लागली, हे दुर्दैव आहे. ही लढाई विचारांची असू शकते. मात्र, व्यक्तिगत जीवनात कधीच असता कामा नये. हाच आदर्श बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांनी दिला आहे, असेही ते म्हणाले.