सत्तेत सहभागी असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचे काम शिवसेना करत आहे, असे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे. तर, राज्यात भाजप-शिवसेनेचे एकत्रित सरकार असले तरी भाजपकडून शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळते, अशी खंत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केली.
शहर शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपर्क अभियानाचा प्रारंभ कासारवाडीत झाला, तेव्हा ते बोलत होते. शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे, सल्लागार भगवान वाल्हेकर, विधानसभा प्रमुख योगेश बाबर, गजानन चिंचवडे, संयोजक श्याम लांडे आदी उपस्थित होते. मेळाव्यात श्रीधर धुमाळ, प्रवीण सुरवसे, संदीप मुनोत, फवाद सय्यद आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. बारणे म्हणाले,की शिवसेनेचा नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात जायचे असल्यास क्षमता सिध्द करावी लागेल. चाबुकस्वार म्हणाले, वॉर्ड आरक्षणानुसार कार्यकर्ते तयार व्हायला हवेत. कलाटे म्हणाले, जनतेला गृहीत न धरता तळागाळापर्यंत काम पोहोचावे. प्रास्ताविक श्याम लांडे यांनी केले. योगेश बाबर यांनी सूत्रसंचालन केले.