शालेय पाठ्यपुस्तकांमधून मुघलांचा इतिहास पूर्णपणे वगळणं चुकीचं आहे, मराठ्यांचं सामर्थ्य किती होतं ते जरूर विशद करून सांगा मात्र मुघलांचा इतिहास पूर्णपणे वगळणं चूक आहे. इतिहास वगळण्याच्या या कृतीला समर्थन देणारे विद्वान म्हणजे सरकारच्या दावणीचे बैल आहेत,अशा विद्वानांना सरकारनं महत्त्व देऊ नये अशी टीका साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनाच हा टोला सबनीस यांनी त्यांचं नाव न घेता लगावला आहे, अशी चर्चा आता रंगली आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभानंतर श्रीपाल सबनीस यांनी आपली रोखठोक मतं मांडली आहेत. संपूर्ण इतिहास बदलणं चूक आहे, तुलना करताना तुम्ही सामर्थ्य आणि मर्यादा स्पष्ट करून सांगू शकता, मात्र मुघलांचा सगळा इतिहासच वगळून टाकायचा हे योग्य नाही, असं घडलं तर एक विशिष्ट प्रकारचं अज्ञान विद्वानांकडून नव्या पिढीच्या माथी मारला जाईल. अपूर्ण ज्ञानामुळे नवी पिढी सम्यक इतिहास समजू शकेल असं वाटत नाही, विद्यार्थ्यांची मनं समृद्ध करायची असतील तर संपूर्ण इतिहास त्यांना समजला पाहिजे असंही मत सबनीस यांनी मांडलं आहे. भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक वादावार भाष्य पहिला सार्वजनिक गणपती हा भाऊ रंगारी यांनी बसवला असेल तर पहिलेपणाचं श्रेय कोणत्याही अटी न घालता त्यांना द्यावंच लागेल. लोकमान्य टिळकांच्या तुलनेत भाऊ रंगारी हे किती प्रमाणात राष्ट्रभक्त होते? याची माहिती अद्याप आपल्याला मिळालेली नाही असंही सबनीस यांनी म्हटलं आहे. लोकमान्य टिळक यांचं देशासाठीचं योगदान राष्ट्रीय पातळीवर सिद्ध झालं आहे. लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यासाठीचं योगदान हे महत्त्वाचं आहे हे माझ्यासह कोणीही मान्य करेल, मात्र मला महापुरूषांपेक्षा आणि त्यांच्या नावावरून होणाऱ्या राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा वाटतो असंही सबनीस यांनी म्हटलं आहे. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींचे मारेकरी मोकाट का? नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांचे मुडदे पाडणारे अद्यापही मोकाटच आहेत. खरे मारेकरी किती प्रमाणात सापडले? उरलेले का सापडत नाहीत? या सगळ्या परिस्थितीला काँग्रेस आणि भाजपचं सरकार का झोपा काढतं? महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे तरीही मारेकरी अद्याप का पकडले जात नाहीत? असेही प्रश्न सबनीस यांनी उपस्थित केले आहेत.