गर्दीच्या रस्त्यांवरील सिग्नल व्यवस्था योग्य नसल्याने वाहनचालकांना नाहक त्रास

शहरातील प्रत्येक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण विचारात घेऊन सिग्नलसाठीची वेळ निश्चित करण्यात येते. सकाळी आठ ते साडेअकरा आणि सायंकाळी पाच ते दहा हा कालावधी गर्दीचा असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर त्या वेळी मोठी वाहतूक असते. सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता अशा सरळ रस्त्यांवर सिग्नलचे सुसूत्रीकरण आवश्यक आहे. या रस्त्यांवरील चौकांमध्ये असणाऱ्या सिग्नलचे सुसूत्रीकरण आवश्यक आहे. तसे केले तरच या गर्दीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होऊ शकेल. नळ स्टॉप चौकातील सर्व सिग्नलचे सुसूत्रीकरण योग्यप्रकारे करण्यात आले आहे.

त्या प्रमाणेच इतरही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित का केल्या नाहीत, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो.

कुमठेकर रस्त्यावरील सिग्नल हिरवा झाल्यानंतर टिळक चौकातून टिळक रस्त्याकडे आणि लाल बहादूर शास्त्री रस्त्याकडे जातानाचा सिग्नल लाल असतो. त्यामुळे एका चौकातून हिरवा सिग्नल मिळालेले वाहनचालक पुढे अगदी जवळच असलेल्या या सिग्नलपाशी न थांबता वाहने पुढे दामटतात. वाहनचालकांच्या या बेशिस्तीमुळे टिळक रस्त्यावरून टिळक चौकात येऊन पुढे लकडी पुलाकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होते. त्यामुळे या सिग्नलचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे आहे. सुसूत्रीकरण नसल्याने आधीच्या चौकात हिरवा आणि तेथून निघाल्यावर लगेच पुढच्याच चौकात लाल सिग्नल असल्याने अनेक वाहनचालक सिग्नल पाळत नाहीत, असे दिसून आले. प्रमुख चौकांमधील सिग्नलचे सुसूत्रीकरण झाल्यास महत्त्वाच्या रस्त्यांवरील कोंडी सुटण्यास मदत होऊ शकेल.