राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाय करावेत याबाबत शिक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासगटाने सिस्कॉम या संस्थेसाठी एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आल्याची माहिती सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, हेरंब कुलकर्णी, माजी शिक्षण संचालक दिलीप गोगटे, राज्य मंडळाचे माजी सचिव शहाजी ढेकणे, निवृत्त शिक्षण उपसंचालक विद्याधर शुक्ल, निवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब आणि सामाजिक कार्यकर्त्यां मुक्ता दाभोळकर यांच्या अभ्यासगटाने हा अहवाल तयार केला आहे. राज्यातील ३५४ गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षकांशी संवाद साधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील यावर हा अहवाल प्रकाश टाकतो. मात्र, या अहवालामध्ये कोणतेही संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आलेले नाहीत, तर प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून दर्जा गाठण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाज, पर्यवेक्षण, शिक्षकांची कार्यपद्धती, शाळा व्यवस्थापन सामिती आणि पालक, मूल्यमापन या मुद्दय़ांवर सूचना देण्यात आल्या आहेत.हा अहवाल येत्या आठवडय़ात सिस्कॉम या संस्थेच्या www.syscom.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहवालात मांडण्यात आलेल्या कोणत्याही मुद्दय़ांवर सूचना द्यायच्या असल्यास किंवा मते मांडायची असल्यास हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१) यांच्याशी संपर्क साधावा किंवा herambrk@rediffmail.com या आयडीवर मेल करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अहवालात देण्यात आलेल्या काही सूचना - प्राथमिक शिक्षणाबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देण्यात यावे.- पर्यवेक्षण यंत्रणा आणि शिक्षकांचे सातत्याने मूल्यमापन करण्यात यावे.- केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची किमान ६० टक्के पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत.- शाळांमध्ये दर्शनी भागात मुलाला कोणत्या इयत्तेत काय आले पाहिजे याचा तक्ता लावावा आणि प्रत्येक पालकांना विद्यार्थ्यांला कोणत्या क्षमता येतात हे सांगणारे ‘शिक्षण गॅरेंटी कार्ड’ देण्यात यावे.- बंद पडलेला चावडीवाचन उपक्रम सुरू करावा.- सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीला प्रवेश देण्यात यावा.- शिक्षकांच्या प्रशिक्षणांची संख्या कमी करावी. मात्र प्रशिक्षणे नवे तंत्रज्ञान वापरून अधिक प्रभावी करावीत.- प्रशिक्षणांमध्ये व्याख्यानांपेक्षा खेळ, कृती यांचा समावेश करावा.- ज्ञानरचनावादाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांसाठी हेल्पलाइन सुरू करावी.