गुढीपाडव्याला उभयमान्य करारावर सह्या होणार; रतन टाटा, एन. चंद्रशेखरन यांच्या दौऱ्याची फलनिष्पत्ती

गेल्या १९ महिन्यांपासून सुरू असलेला टाटा मोटर्स कंपनीतील कामगार-कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष पूर्णपणे मिटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी (२८ मार्च) व्यवस्थापन व कामगारांना मान्य असलेल्या करारावर सह्य़ा होणार आहेत. सुटीचा दिवस असतानाही रविवारी (२६ मार्च) कंपनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींत झालेल्या संयुक्त बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा व अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर वेगवान घडामोडी झाल्या व त्याची फलनिष्पत्ती म्हणूनच हा करार होत असल्याचे सांगण्यात आले.

वेतनवाढ करार न अन्य मागण्यांवरून कंपनीत १९ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. यापूर्वी, विविध मार्गानी कामगारांनी आपले म्हणणे मांडले. मात्र, व्यवस्थापनाकडून दाद मिळत नव्हती म्हणून कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. नव्याने सुरू झालेल्या चर्चेदरम्यान पुन्हा वाटाघाटी फिसकटल्याने १६ मार्चपासून कामगारांनी कंपनीत आंदोलन सुरू केले. तणावपूर्ण वातावरणातच सोमवारी (२० मार्च) रतन टाटा व एन. चंद्रशेखरन पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार कंपनीत आले होते. मात्र, कामगारांच्या आंदोलनाची माहिती झाल्यानंतर इतर कार्यक्रम बाजूला ठेवून त्यांनी सर्वप्रथम कामगार प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. त्यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर १५ दिवसात निर्णय घेऊ, अशी ग्वाही टाटा यांनी दिली होती. त्यानंतर, कंपनी स्तरावर वेगवान हालचाली झाल्या. पाच दिवसात त्याचे दृश्य परिणाम दिसून आले. टाटांच्या दौऱ्यात त्यांच्यासमवेत असलेले कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांनी रविवारी बैठक बोलावली. या वेळी व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी व प्रमुख कामगार प्रतिनिधी यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर, दोघांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने सर्व मुद्दय़ांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने याच दिवशी करारावर सह्य़ा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रविवारी झालेल्या बैठकीत चालू पगारातील वाढ, निश्चित पगाराचे टप्पे, ब्लॉक क्लोजर आदी ठोस निर्णय घेण्यात आले आहेत.

  • १ सप्टेंबर २०१५ पासून तीन वर्षांचा वेतनकरार राहणार आहे.
  • कामगारांना सरासरी १७ हजार ३०० रूपये वाढ मिळणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने तीन टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत.
  • कंपनीच्या वतीने यापूर्वी वर्षांला १२ ब्लॉक क्लोजर घेण्यात येत होते. त्यामध्ये आणखी सहाची वाढ करण्यात आली असून यापुढे वर्षांकाठी १८ ब्लॉक क्लोजर होतील.