राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिंचवडच्या मेळाव्यात भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा यथेच्छ समाचार घेतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. यानिमित्ताने पुन्हा एकदा पिंपरीत ‘राष्ट्रवादी विरुद्ध भाजप’ असे चित्र पुढे आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यादृष्टीने भाजपच्या स्थानिक नेत्यांना हवी ती ताकद देण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी ठेवले आहे. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता मुख्यमंत्री विरुद्ध अजित पवार यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. जेमतेम सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उद्योगनगरीच्या राजकीय आखाडय़ात ‘मुख्यमंत्री विरुद्ध अजित पवार’ असा सामना होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी पालिकेच्या प्रभागरचनेची मोडतोड केली. गृहखाते आणि एकूणच राज्याचा कारभार सांभाळण्यास अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांना काही काम राहिले नाही. ते ऊठसूट िपपरी पालिकेच्या राजकारणात हस्तक्षेप करू लागले आहेत, असे आरोप राष्ट्रवादीच्या मेळाव्यात करण्यात आले आणि एकप्रकारे पिंपरीच्या राजकीय आखाडय़ात थेट मुख्यमंत्र्यांनाच ओढण्याचा प्रयत्न झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहराचे ‘कारभारी’ आहेत. मुख्यमंत्र्यांनी पिंपरी पालिकेच्या राजकारणात बऱ्यापैकी लक्ष घातले असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांना हवी ती ताकद देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले. त्यामागे कारणही तसेच आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सगळेचजण राष्ट्रवादीच्या मागे हात धुऊन लागले आहेत. पिंपरी पालिकेतील एकेक अर्थपूर्ण ‘प्रकरणे’ काढून राष्ट्रवादीचा कारभार किती ‘भ्रष्ट’ आहे, हे चव्हाटय़ावर आणण्याचा सपाटाच भाजप नेत्यांकडून सुरू आहे. स्थानिक नेत्यांच्या या मोहिमेला मुख्यमंत्र्यांची ताकद मिळते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या गळतीमुळे या अस्वस्थतेत भरच पडलेली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असलेले आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यांनी भाजपची वाट धरल्याने भाजपला पिंपरीत ‘अच्छे दिन’ येऊ लागले असून, बलाढय़ राष्ट्रवादीची मात्र हालत खराब झाली आहे.

बारामतीखालोखाल राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचा डोलारा कोसळला. लोकसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दाणादाण उडाली. तर, विधानसभा निवडणुकीत शहरातून राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही, ही अजितदादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती होती. त्यामुळेच फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत पिंपरी पालिकेची निर्विवाद बहुमत असणारी सत्ता राखण्याचे मोठे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. मात्र त्यांच्यासाठी पूर्वीइतकी अनुकूल परिस्थिती राहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक नगरसेवक, राष्ट्रवादीची पदे भोगलेले अनेक कार्यकर्ते भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला दररोज भगदाड पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही अजित पवार यांचा वैयक्तिक करिश्मा कायम आहे. आजही राष्ट्रवादी हाच शहरातील सत्तेचा प्रबळ दावेदार आहे. सत्तेची हॅटट्रिक साधताना १२८ पैकी १०० जागाजिंकण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार असून, शहरविकासाचा मुद्दा आणि अजित पवारांचा चेहरा हेच राष्ट्रवादीचे भांडवल आहे. त्यावरच प्रहार करण्याची भाजपची व्यूहरचना आहे.

कितीतरी वर्षे शहराची खरी सत्ता काँग्रेसकडेच होती. राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेसची घसरण सुरू झाली. रामकृष्ण मोरे हयात होते, तोपर्यंत त्यांनी राष्ट्रवादीशी ‘मैत्रियुक्त’ संघर्ष करत काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या निधनानंतर शहर काँग्रेस पोरकी झाली. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, हक्काचे मतदार राष्ट्रवादीने ‘हायजॅक’ केले. शहरविकासाच्या पायाभरणीचे जे श्रेय रामकृष्ण मोरे आणि काँग्रेस पक्षाचे आहे, मात्र ते सरसकट राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झाले. काँग्रेसकडून नव्या जोमाने ‘मिशन २०१७’ची वाटचाल सुरू आहे. मात्र, घरभेदी आणि गटबाजीचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. शिवसेनेची ताकद मोठी, मात्र विभागलेली आहे. प्रत्येक भागातील सुभेदार वेगळे आहेत. त्यांची एकत्र येण्याची मानसिकता नाही. राष्ट्रवादीविरुद्ध वातावरणनिर्मिती करण्यात यापूर्वी शिवसेनेने आघाडी घेतली होती. आता परिस्थिती बदललेली आहे. भाजपशी युती करायची की नाही, यावरून पक्षात परस्परविरोधी मते आहेत. राष्ट्रवादी हा प्रमुख शत्रुपक्ष आहे की भाजप, अशी संभ्रमावस्थाही आहे. मनसेमध्ये बराच काळ रिक्त असलेल्या शहराध्यक्षपदी दोन जणांची वर्णी लागली. मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दुसरे नगरसेवक मंगेश खांडेकर त्याच बेतात आहेत. पक्षाचे गटनेते अनंत कोऱ्हाळे अस्वस्थ असून, तेही पक्षाबाहेर पडतात की काय, अशी स्थिती आहे.