आजपासून दोन दिवसांची परिषद गवत, पालापाचोळा, लाकूड, गावशिवारामध्ये तयार होणारा कचरा, उसाचे पाचट, गहू-भाताचा भुसा अशा कचऱ्यापासून शंभर टक्के भारतीय बनावटीचे बायोडिझेल निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पुण्यातील तरूण उद्योजकांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे जागतिक पेटंटही मिळाले आहे. या तंत्राचे सादरीकरण गुरुवारपासून (२३ फेब्रुवारी) दोन दिवस होत असलेल्या राष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा परिषदेत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या पाश्र्वभूमीवर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरतर्फे हॉटेल शेरेटॉन येथे अपारंपरिक ऊर्जा या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायो इंधन अशा अपारंपरिक ऊर्जेवर आधारित नावीन्यपूर्ण संशोधन, उत्पादने व तज्ज्ञांची चर्चासत्रे असे परिषदेचे स्वरुप असेल, अशी माहिती मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद चौधरी आणि महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिर्के एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध शिर्के, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अभिजित शिर्के, रिलायऑन सोलरचे उपाध्यक्ष सुहास पानसरे या वेळी उपस्थित होते.अनिरुद्ध शिर्के म्हणाले, कचऱ्यापासून बायोडिझेल तयार करणाऱ्या तंत्रज्ञानाामुळे ग्रीन इंधन उपलब्ध होईल. हे यंत्र चालविण्यासाठी बाह्य़ ऊर्जेची कोणतीही गरज नाही. शेतात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून इंधननिर्मिती होणार असल्याने, ते पर्यावरणपूरक आहे. तसेच वाहनामध्ये कोणताही बदल न करता हे इंधन थेट वापरता येऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. या परिषदेनिमित्त या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे.