वेळेचा अपव्यय, सत्कारांचा अतिरेक, अन्नाची नासाडी, मानापमान विवाह म्हणजे एक मंगल सोहळा, मात्र दिवसेंदिवस त्याचे स्वरूप प्रदर्शनीय, एखाद्या इव्हेन्टसारखे आणि ओंगळवाणे असे झाले आहे. मोठय़ा प्रमाणात होणारी पैशांची उधळपट्टी, अन्नाची नासाडी, सत्कारांचा अतिरेक, मानापमान, वेळेचा अपव्यय, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा प्रचंड मनस्ताप असे काहीसे चित्र अशा लग्नांच्या निमित्ताने पुढे आले आहे. प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळू लागल्याने असे सोहळे कमी न होता वाढू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह पंचक्रोशीत अशा विवाह सोहळ्याच्या निमित्ताने होणारे संपत्तीचे प्रदर्शन नवे राहिलेले नाही. स्थानिक, भूमिपुत्र, गुंठामंत्री वर्गासह बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योगपती, राजकारणी, धनदांडगे अशी उधळपट्टी करण्याच्या कामात आघाडीवर आहेत. लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्चाचा अतिरेक एका बाजूने न होता वधू-वर या दोन्ही पक्षाकडून होत असतो. कार्यालयाचे भाडे ७० हजार ते अडीच लाखांपर्यंत आहे. स्टेज डेकोरेशनचा खर्च दोन लाखांपासून पुढे कितीही केला जातो. डीजे, झांजपथक, बग्गी, घोडा, रथ, भांगडा नृत्य, वाजंत्री, फोटो शूटिंग अशाप्रकारे खर्चाची वर्गवारी केली जाते. आता विवाहपूर्व व्हिडीओ शूटिंग, एअर फोटोग्राफी असे नवीन आले आहे. महागडय़ा लग्नपत्रिका हे अनेकांच्या लग्नसोहळ्यातील ‘वैशिष्टय़’ मानले जाते. महत्त्वक्रमानुसार वेगवेगळ्या पत्रिका तयार केल्या जातात व प्रत्येक पत्रिका खर्चिकच असते. पत्रिकांमध्ये असंख्य नावे टाकण्याची पद्धती रूढ झाली आहे. एकाच पत्रिकेत ६००-७०० नावे टाकण्यात आल्याचे दाखले आहेत. प्रेषक, संयोजक, स्वागतोत्सुक, निमंत्रक, व्यवस्थापक, आशीर्वाद, विशेष उपस्थिती, मित्र परिवार अशा गोंडस नावाखाली ही नावे टाकली जातात. फटाक्यांची आतषबाजी ठरलेली आहे, त्यासाठी लाखो रुपयांचा धूर केला जातो. जेवणात असंख्य पदार्थ ठेवले जातात. ताटात ते बसत नाहीत आणि एखादा मनुष्य तेवढे खाऊ शकत नाही. परिणामी, ताटात बरेचसे अन्न तसेच राहते. मोठय़ा प्रमाणात अन्नाची नासाडी होते. मात्र, जेवणासाठी लाखो-करोडो रुपये खर्चाचा अट्टहास कायम आहे. सत्कारांचा अतिरेक ही अशा लग्नांमधील मोठी डोकेदुखी झाली आहे. पुढाऱ्यांना नको तितके महत्त्व दिले जाते व इतरांची उपस्थिती अदखलपात्र ठरते. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव पुकारण्याचा तसेच त्याच्या सत्काराचा अट्टहास केला जातो, त्यातून मानापमान नाटय़ होते. माइक हातात पडला की पुढाऱ्यांना राहवत नाही. उपस्थितांचे स्वागत, वधू-वरांना आशीर्वाद देण्याच्या नावाखाली भाषण ठोकण्याची संधी ते सोडत नाही. आता लग्नातच सामाजिक संस्थांना देणग्यांचे वाटप करण्याची पद्धत सुरू झाली आहे. लग्न वेळेवर लागत नाहीत, दोन-तीन तास उशिराने लग्न झाल्याची उदाहरणे आहेत. फक्त लग्नच नव्हे, तर साखरपुडे, टिळे देखील खर्चिक झाले आहेत. एखाद्या सामान्य कुटुंबातील लग्न उरकेल, इतका खर्च फक्त टिळ्याच्या कार्यक्रमात होतो. लग्नात मांडण्यात येणाऱ्या भेटवस्तू पाहून एखाद्याचे डोळे पांढरे होतील. आलिशान मोटारी, बुलेटसारखी वाहने, महागडे फर्निचर सर्रास लावली जातात. गेल्या काही वर्षांत प्रतिष्ठेच्या नावाखाली लग्नातील उधळपट्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असा सूर व्यक्त होत असला तरी तशी कृती मात्र होताना दिसत नाही. वाहतूक कोंडीचा लाखोंना मनस्ताप हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात असलेल्या मंगल कार्यालयांमुळे आयटी क्षेत्रातील नागरिकांसह या भागातील रहिवाशांना मोठय़ा प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. आळंदी-भोसरी रस्ता तसेच वडगाव-तळेगाव रस्त्यावर फारशी वेगळी परिस्थिती नाही. मंगल कार्यालय म्हणजे वाहतूक कोंडी हे समीकरण झाले आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना त्रास होतो. वऱ्हाडी मंडळी, नाचणारे तरुण यांच्यामुळे त्यात आणखी भर पडते. मिरवणुकांना पोलीस परवानगी बहुतांश वेळा नसतेच. वेळ पडल्यास पोलिसांना मुक्त हस्ताने पैसे देण्याची आयोजकांची तयारी असते.