कधी पाऊस, कधी ऊन, वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. वातावरणामध्ये विषाणू अचानक वाढल्याने विषाणूजन्य आजार पटकन फैलावतात आणि लवकर पसरतातसुद्धा. कीटकजन्य आजारही हल्ली खूप थैमान घालत आहेत. पाण्याची साठवणूक , अनावश्यक ठिकाणी पावसामुळे साठलेले पाणी, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आदी कारणांमुळे कीटकांची उत्पत्ती वाढते. उदाहरणार्थ डास, माश्या, चिलट इत्यादी आणि यातून साथीचे आजार वाढीस लागतात. काही वेळा ते जीवघेणेसुद्धा ठरतात. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रिया, लहान मुले, वृद्ध, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, कारण या व्यक्तींची तब्येत लवकर बिघडू शकते.

सध्याच्या साथीच्या आजारांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, विषाणूजन्य ताप आदींचा समावेश आहे. ताप हे प्रमुख लक्षण आहे व त्याबरोबर पेशी कमी होणे, सांधेदुखी, अंगदुखी अशी अनेक लक्षणे आढळतात. औषधे तर नक्की घ्यायलाच हवीत. पण त्याबरोबर खाण्याची पण काळजी घेतली तर लवकर बरे होऊन नंतरचे उपद्रवसुद्धा कमी राहतात. पुढील प्रकारे आहाराद्वारे काळजी घ्यावी.

  • ताप असताना द्रवपदार्थ जेवणामध्ये भरपूर घ्यावेत. उदाहरणार्थ पाणी, नारळपाणी, ज्यूस, डाळीचे पाणी, सरबत, भाज्यांचे सूप.
  • जेवण जात नसले तरी थोडे थोडे जेवण थोडय़ा थोडय़ा वेळाने घ्यावे.
  • कोरडे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. पातळ जसे मुगडाळ खिचडी, पातळ दलिया, वरण-चपाती कुस्करून खावे.
  • हळद, गवती चहा, आले, लसूण या औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थाचा वापर वाढवावा.
  • क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ जास्त खावेत. (आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब, लिंबू) पेशी वाढविण्यासाठी डाळिंब, पपईचा वापर करावा.
  • सांधेदुखी असेल तेव्हा अक्रोड, जवस, लसूण, हळद आदींचा वापर जरूर करावा.
  • परसबागेत वाढणाऱ्या गूळवेलीच्या काढय़ाचा चांगला उपयोग होतो. प्रथिनांचा वापर भरपूर करावा. जसे दूध, डाळी, कडधान्ये, अंडी.
  • घरी शिजविलेले ताजे अन्न वापरावे. बाहेरील अन्नपदार्थ वापरू नये.

dr.sarikasatav@rediffmail.com