‘मी विचार करतो, म्हणून मी आहे..’ असे फ्रेंच गणितज्ज्ञ, तत्त्ववेत्ता देकार्त म्हणाला होता. म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच विचार करणे हे आहे, आपल्या अस्तित्वाचा पायाच विचार करणे हा आहे, अशी त्याची ठाम धारणा होती. त्याच धर्तीवर ‘मी लिहितो, म्हणून मी आहे,’ असे म्हणता येतेच की! तसे म्हणतही असतात अनेक जण. ज्यांच्या खऱ्याखुऱ्या अस्तित्वाच्या मुळाशी लिखाण आहे, त्यांची ही धारणा असतेच असते. आता भौतिक दृष्टीने विचार करायला गेल्यास लिहिणे म्हणजे काही ऑक्सिजन- प्राणवायू- नाही, की ज्याच्या अभावी कुणाचा श्वास (उत्तर प्रदेशातील बाळांप्रमाणे!) अडावा. लिहिले नाही तर मरणाशीच गाठ, असे भौतिक अर्थाने नाही होत. पण तरीही लिहिल्याशिवाय, व्यक्त झाल्याशिवाय जगता येत नाही, असा काही प्रकार असतो. यात एक महत्त्वाची बाब म्हणजे लिहिण्यासाठी आधी मुळात विचार करावा लागतो. निदान थोडीफार सुजाण माणसे तरी अशी धारणा बाळगून असतात मनाशी, की जे लिहीत आहेत ते थोडाफार तरी विचार करीत आहेत.

‘मी विचार करतो, म्हणून मी आहे,’ हे वाक्य देकार्तने उच्चारले होते ते सतराव्या शतकात. त्याने खूप विचार केला आणि खूप लेखनमांडणीही केली. म्हणून मग देकार्तला सुदैवी वगैरे म्हणून टाकू या का? हे आधीचे प्रश्नचिन्ह देण्याचे कारण म्हणजे कुणाला हे ‘सुदैव’, ‘दुर्दैव’ शब्द आवडतील, कुणाला नावडतील. तर, देकार्तला विचार करता आला.. त्याला लिहिता आले म्हणून सुदैवी म्हणायचे. विचार करता येणे, लिहिता येणे हे सुदैव असेल तर त्याच्या विरुद्ध जे काही असेल ते दुर्दैव- हा सरळ-सोपा हिशेब. म्हणजेच विचार करता न येणे, लिहिता न येणे, हा हिशेब अधिक नीटसपणे मांडायचा तर.. आपल्याला हवा तो विचार करता न येणे, आपल्याला हवे ते लिहिता न येणे, हे दुर्दैव. आता यातला विचार असतो अदृश्य. त्यामुळे समोरच्याला नाही कळत, की बुवा या आपल्या पुढय़ातल्या माणसाच्या डोक्यात काय घोळते आहे. पण लिखाण तर अगदी साक्षातच असते. त्यातून लिहिणाऱ्याचा विचार समोर येतोच. आता कुणाचा विचार कसा असतो, तर कुणाचा कसा. एकाचा विचार म्हणजेच त्याचे लिखाण दुसऱ्याला आवडेल किंवा नाहीदेखील आवडणार. हे आवडी-नावडीचे स्वातंत्र्य आहेच की! म्हणजे असायलाच हवे ना ‘आपल्यासारख्या लोकशाहीत’! खरे तर ‘आपल्यासारख्या लोकशाहीत’ असे म्हणणे योग्य नव्हे. लोकशाही ती लोकशाहीच की; जी कालही होती.. आजही आहे.. उद्याही राहील. पण कालचीच लोकशाही आज असेल असे नाही आणि आजचीच लोकशाही उद्या असेल असे नाही. ती विकसित होत जायला हवी कालानुक्रमे. म्हणजे ही आपली एक साधीसुधी, भोळीभाबडी अपेक्षा.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

ही भोळीभाबडी अपेक्षा पूर्ण होत नसेल तर काय करावे? म्हणजे समजा, आपल्याला हवा तो विचार करता आला तरी तो जगापुढे मांडता येत नसेल, त्यानुसार लिहिता येत नसेल, तर काय करावे?

या प्रश्नाचे एक साधे उत्तर म्हणजे विचारच करू नये कुणी. आणि समजा केलाच विचार, तर लिहूच नये कुणी. म्हणजे भोवती काही विपरीत होत आहे, नको ते घडते आहे, तर त्याकडे थेट दुर्लक्षच करावे. आपल्या पोटाची खळगी भरण्याची काळजी करावी, आपल्या जिवाची काळजी करावी. कोण काय करतोय, कोण काय बोलतोय, कोण शस्त्रे परजतोय वगैरे अर्थशून्य गोष्टींमध्ये पडायची काही गरज असते का? कुणी सांगितले आहेत नसते उपद्व्याप? लेखणीपेक्षा जीव नाही का महत्त्वाचा? विचार करणाऱ्यांना इतकी साधी गोष्ट कळू नये? ही साधी गोष्ट नाही कळली, की ती न कळणाऱ्यांचे काय होते, ते दिसतेच अवतीभवती.

तरीही काही पागल, वेडे असतातच. लेखणीपेक्षा जीव महत्त्वाचा, ही साधी गोष्ट त्यांना कळत नाही. किंवा कळूनही न कळल्यासारखे करतात ते. हा वेडेपणा त्यांच्या अंगात संचारतो कशामुळे? एक पिसे त्यांच्या अंगात भिनते ते कशामुळे?

या प्रश्नांचे एकाच शब्दातील उत्तर.. इमान.

हे इमान स्वत:शी. हे इमान स्वत:च्या विचारांशी. हे इमान स्वत:च्या कृतींशी. हे इमान स्वत:च्या लेखनाशी. हे इमान स्वत:च्या आणि समस्तांच्या समग्र स्वातंत्र्याशी.

सोपे नसतेच मुळी हे इमान राखणे. इमान राखत मुलूख चालत जाणे मोठेच अवघड. अनघड. चालताना कुठे पावले रक्तबंबाळ व्हायची खात्री. कुठे जीव थेट चिरडला जाण्याची दहशत. कुठे लालूच दाखवणारी मोहाची फुले. कुठे भुलीच्या वाटा. कुठे निराशेचे डोह. कुठे सावलीनेही सोबत सोडून जावे असे एकटेपण. कुठे प्रच्छन्न टीकाफेक, उपहास.

तरीही वेडे, पागल राखतातच इमान. चालतातच ते आपल्यापास राखून स्वत:च्या स्वतंत्र वाटा. हे वेडे असतील मूठभर.. आहेतच. पण तरीही ताकद आहेच त्यांची, त्यांच्या लेखणीची. हे लिखाण कुठल्या स्वरूपातले? तर कुठल्याही. कविता, कथा, कादंबरी, लेख, बातमी.. काहीही. उच्च स्थानांवरचे शहाणे, तसेच झुंडी कितीही व कशीही करोत संभावना या लेखणीची.. त्यांच्याही एकाकी, भयकंपित मनात असतेच जरब त्या शब्दांची. ही जरब कशामुळे? त्यांनाही जाणवत असतेच आतल्या आत.. हे शब्द हलवू शकतात आपली सिंहासने. हे शब्द तोडू शकतात आपल्या मोहमयी शब्दांचे भूलफेकीचे जाळे. या शब्दांमुळे दृग्गोचर होऊ  शकतात वास्तवाचे प्रखर सूर्य. झुंडींशीही टक्कर देऊ शकतात हे शब्द. म्हणूनच मग यत्न केले जातात कळसूत्री बाहुल्यांमार्फत ही अशी लेखणी थांबविण्याचे. नाहीच थांबले तर चेचण्याचे. मग चेचलेल्या लेखणीपाशी क्षणभर थबकून सिंहासनाधीश्वर पाळतात एक मिनिटाचे पाळीव मौन आणि वाहतात श्रद्धांजली. कोरडी टिपे गाळून ते लागतात पुढील कामाला.. यापुढे लेखणी चेचणाऱ्यांची गय करणार नाही, असा कडक इशारा कितव्यांदा तरी देत! आणि झुंडीही करतात साजरे आनंदोत्सव- एक आणखी लेखणी खपल्याचे.

अशावेळी आपण- वाचकांनी- काय करायचे? केवळ श्रद्धांजली वाहायची? डोळे कोरडे करून पुढील लेखणी चेचली जाण्याची वाट बघत बसायचे? चेचलेल्या लेखण्यांचे क्रमांक मोजत राहायचे? की जो काही आवाज आहे आपल्यापास क्षीणदीन- तो शक्य तेवढा बुलंद करायचा? किमान मुखर तरी करायचा? तर- यातील दुसऱ्या रीतीचा पर्यायच अवलंबिणे इष्ट. आपला आवाज नसेल तेवढा मोठा; पण लेखकाचा आवाज मोठा असतोच.. निदान आपल्यापेक्षा. लेखक जर विपरीताच्या विरोधात आवाज उठवत असेल, तर त्या आवाजाला आपलाही आवाज जोडायला हवा. त्या आवाजाचा कोरस व्हायला हवा. एखादा आवाज समजा नसेल आपल्या विचाराचा; तरीही त्या आवाजालाही ‘असण्याचा’ हक्क आहेच पुरेपूर- हे जाणून घ्यायला हवे.

कारण इमान ही फक्त लेखकानेच बाळगावी अशी गोष्ट नाही. निव्वळ लेखकच ते बाळगू शकतो असे नाही. ते आपण वाचकांनीही बाळगायला हवे. कारण आपणही ते बाळगू शकतो. आपलाच आवाज जर लेखक मुखर करत असेल तर त्याला बळ द्यायला हवे. असे बळ नाही मिळाले तरी इमान राखलेला लेखक लिहीत राहीलच, हे खरे; मात्र आपलेही काही नियत कार्य आहेच ना! लिहिता नाही येत आपल्याला.. बोलता नाही येत आपल्याला. ठीक आहे. पण जे आपण करू शकतो ते तर करायलाय हवे ना! केवळ मौनात राहून चालणारे नाही. कारण ते परवडणारे नाही. आजच्यासाठी.. आणि उद्याच्यासाठीही!

राजीव काळे

rajiv.kale@expressindia.com