‘नटसम्राटाने जागविल्या मित्रवर्याच्या आठवणी’ बातमी वाचली. (२० एप्रिल) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला ८ महिने उलटूनही काहीही थांग लागत नाही हे सरकारचे मोठे अपयश आहे, आणि त्यासाठी सतत पाठपुरावा केलाच पाहिजे. पण ज्या पुलावर त्यांची हत्या झाली तिथे स्मारक उभारावे अशी मागणी ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी केली आहे, ती मात्र अवास्तव वाटते. रहदारीच्या रस्त्यावर स्मारक उभारून नागरिकांना,पादचाऱ्यांना त्रास देणे बरोबर नाही. त्या ठिकाणी अनिसतर्फे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले, तेही लोकांच्या नागरी स्वातंत्र्यावर, तेथे मुक्तपणे वावरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. दाभोलकरसर हे विज्ञानवादी, आणि समाजाच्या हिताचा नेहमी विचार करणारे  होते. स्थानमाहात्म्य म्हणून रहदारीच्या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे हा दाभोलकर यांच्या विचारांचा पराभव करण्यासारखे आहे. त्यामुळे अनिसला विनंती की त्यांनी असे कार्यक्रम रस्त्यावर करू नयेत आणि स्मारकही उचित ठिकाणी उभारावे.
– सौमित्र राणे, पुणे

अजितदादा जीभ नको; पाणी मोकळे सोडा
बारामतीचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या अजित पवारांनी आपली ‘बारा’मती जनतेच्या विकासासाठी पाजळावी. मासाळवाडी जनतेने तुम्हाला पाणी कधी देणार हा साधा प्रश्न विचारला होता. पाणी तर मिळालेच नाही. पण तुम्ही धमकी मात्र दिली. किती वेळा जनतेने तुम्हाला माफ करायचे. जनता तुमच्याकडे पाणी मागतेय आणि तुम्ही मत मागताय. मत मागताना जरा तरी बोलायचे भान ठेवायाचे. निव्वळ सत्तेचा माज आल्याचे दाखवू नका. जनता आता फार हुशार झालीय. दादा, आता तुम्ही जीभ मोकळी सोडू नका, तर व्याकुळलेल्या जनतेसाठी पाणी सोडा.
-रमेश अंबिरकर, डिकसळ, ता. कळंब, जि.उस्मानाबाद  

महिनाभर थांबता आले असते
पंतप्रधानांचे प्रसिद्धी सचिव व माजी कोळसा सचिव यांची पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. मात्र या दोघांनीही आपली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी आताचीच वेळ का निवडली असावी ही  शंका मनात उभी राहते. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या ५-१० वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीचा पंचनामा विरोधी पक्ष करत आहेच. त्यांना मदत व्हावी असा या दोन्ही लेखकांचा हेतू उघड आहे. निवडणुकांच्या प्रचारात काही ठळक मुद्यांवर आरोप-प्रत्यारोप, खुलासे-प्रतिखुलासे होत असतात. उदा. शरद पवार यांनी ‘अध्र्या चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता देणार काय’ अशी टीका करताच उद्धव ठाकरे यांनी ‘चड्डीची काळजी करण्याऐवजी आपल्या लेंग्याची नाडी सांभाळा’ असा प्रतिटोला दिला., मात्र जर एखाद्याने पुस्तक लिहून कोणावर काही आरोप केले असतील तर पत्रकार परिषद घेऊन त्याचा प्रतिवाद केला जाऊ शकत नाही. त्यासाठी त्या पुस्तकाचा संपूर्णपणे अभ्यास करून लेखकाने उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याचा समाचार घ्यावा लागतो. किंबहुना त्यासाठी दुसरे एखादे पुस्तकच लिहावे लागते आणि निवडणुकांच्या धामधुमीत हे शक्य नसते.
या दोन्ही रामशास्त्र्यांनी आपली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी निवडलेली वेळ ही निषिद्ध मानल्या गेलेल्या कार्यशैलीत unfair practice)) बसणारी आहेत. संपूर्ण मतदान आटोपल्यानंतर पुस्तके प्रसिद्ध करता आली असती. महिनाभर थांबता आले असते.
– राजेंद्र कडू

मतदार चिठ्ठीतील गमती-जमती
आता राज्यात एप्रिल २४ रोजी शेवटचे मतदान होत आहे. मला निवडणूक मंडळाकडून आलेली मतदार चिठ्ठी मोठी गमतीशीर आहे. मी सारे आयष्य पापडी-सोनारभाट येथे राहतो, मात्र आता माझा पत्ता भुईगाव या माझ्या राहत्या ठिकाणाहून १५ मलावर असलेल्या गावाचा दिलेला आहे. नाव चुकीचे दिले आहे. मतदार चिट्ठीतील अक्षर वाचताना चष्मा दहावेळा खालीवर करावा लागतो. मतदार चिठ्ठीच्या मागे ज्या सूचना दिल्या आहेत ती खास सरकारी मराठी भाषा आहे. अर्थात याचा सारा दोष अधिकारी वर्ग व निवडणूक मंडळाकडे जातो. शुद्ध मराठी लिहिणारे आजही निवडणूक मंडळाला मिळू नयेत ही शोकांतिका आहे.
– मार्कुस डाबरे, पापडी, वसई  

अभ्यास आणि सुटी या वादापलीकडचे काही..
शिक्षण विभागाने सुटीत मुलांना अभ्यास करायला सांगितला अशा बातमीवर तीव्र प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’त उमटल्या. शिक्षण विभागाचे म्हणणे असे की केवळ आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन म्हणून अभ्यासाची कल्पना होती, सुटीभर नव्हती, तर पालकांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. मला दोन्ही बाजूंच्या पलीकडे जाऊन चच्रेसाठी या निमित्ताने काही मुद्दे मांडायचे आहेत.
१० एप्रिलला परीक्षा संपल्यावर १ मे पर्यंत शासकीय सुटी नसते. ते कामकाजाचे दिवस असूनही शाळा मुलांना अनधिकृत सुटी देतात व मुलांची खोटी हजेरी मांडतात. या २० दिवसांच्या अनधिकृत सुटीबाबत शिक्षण विभाग व पालक दोघेही शाळांना जाब विचारत नाहीत. वास्तविक नव्या मूल्यमापन पद्धतीत या दिवसात पूरक अध्यापन घेणे अपेक्षित आहे. ते किती ठिकाणी सुरू असते? पालक इथे का संतापत नाहीत?
१० एप्रिल ते १५ जून अशी जवळपास २ महिने मुलांना सुटी असलीच पाहिजे. शाळा बंदच असल्या पाहिजेत हे गृहीत धरूनच टीका झाली. ब्रिटिशांना सोसवत नसलेल्या उन्हाळ्यातून उन्हाळी सुटी आली. आम्ही हेच अंधानुकरण किती दिवस करणार आहोत?  आपली मुले या दीर्घ सुटीत खरंच घरी अशी काय सर्जनशील कामे करतात याचा पालकांनी विचार करायला हवा. १५ एप्रिल ते १० मेपर्यंत सकाळचे तास नक्कीच चांगल्या रीतीने उपयोगात आणता येतील का? पालक आज छंदवर्गाच्या नावाखाली हजारो रुपये बाहेर देतात. हेच छंदवर्ग शाळांनीच फी घेऊन चालवले तर शाळांनाही पसे मिळतील. शाळेचे चित्रकला, क्रीडाशिक्षक बाजारू छंदवर्गापेक्षा नक्कीच चांगले शिकवतील. उपक्रमशील पालक स्थानिक कलावंतांनाही निमंत्रित करायला हवे. त्यातून पालक-समाज सहभाग वाढेल.
माध्यमिक शाळांचे कामकाज १००० तास होत नाही, हे सप्रमाण मी ‘लोकसत्ता’त मांडले होते. त्या तासिका अशा पद्धतीने भरून निघू शकतात. पूरक वर्ग छंदवर्गाला शिक्षकांना आलटून पालटून जबाबदारी दिली तर शिक्षकांनाही सुटी मिळेल. १५ एप्रिल ते १० मे हा काळ तर नक्कीच उपयोगात येऊ शकतो. शहरी भागातल्या अनेक शाळा असे उपक्रम पूर्वीपासून करतात. ते शासन आदेशाने सर्वत्र होण्याची गरज आहे.
विदर्भ, जळगावच्या तीव्र उन्हाळ्यामुळे सर्वच शाळा १५ जूनला उघडतात. उर्वरित महाराष्ट्रात शाळा लवकर उघडणे शक्य आहे. त्या १० दिवसांच्या सुटय़ा आदिवासी भागात तीव्र पावसाळयात घेता येतील.
एकूणच सुटी या विषयाकडे अतिसंवेदनशीलपणे न बघता त्या सुटीचा उपयोग अभ्यासाव्यतिरिक्त कौशल्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा होईल याचा शाळा व पालकांनी विचार करायला हवा. शाळा या ३०० दिवस उपयोगात आल्या पाहिजेत. बारमाही पाण्यासारखे शिक्षणही बारमाही हवे.
-हेरंब कुलकर्णी

चीनकडून भारताला डिवचणे चालूच!
युथ एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत चीनने केंद्रशासनाला सशर्त आमंत्रण पाठवले आहे. आमच्या देशात येणाऱ्या भारताच्या प्रतिनिधींमध्ये अरुणाचल प्रदेश येथील तरुणांचा समावेश करू नये, अशी अट चीनने घातली आहे. या प्रसंगावरून भारताला डिवचण्याची एकही संधी चीन सोडत नाही, हे लक्षात येते. चीनचा हा डाव लक्षात घेऊन भारताने चीनला सडेतोड उत्तर द्यावे.
– सचिन पाटील