श्रीधर गांगल व मुरली पाठक यांची (अनुक्रमे) स्वामी विवेकानंद व रामकृष्ण संघाबाबतची पत्रं (लोकमानस ३ व ४ सप्टेंबर) वाचली. ११ सप्टेंबरला (सन १९०८) महात्मा गांधी यांनीसुद्धा दक्षिण आफ्रिकेत पहिले जाहीर भाषण केलेले वाचनात आहे. याबाबत मला खालील मुद्दे उद्बोधक वाटतात –  
१)  ११ सप्टेंबरच्या वरील सर्व घटनांत दिवसाचे साम्य वगळता दोन टोकांच्या विचारसरणीची तुलना आहे. मानवी संस्कृती नष्ट करू पाहणारा ट्विन टॉवर्सवरील हल्ला व विश्वमानवतेसाठी स्वामी विवेकानंदांनी व महात्मा गांधींनी दिलेली भाषणे यांचा तुलनात्मक विचार करणे उचित ठरेल.
२) रामकृष्ण संघ स्वामी विवेकानंद यांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरण व घटनेनुसार आजही शतकोत्तर कार्य करणारा सेवाभावी संघ आहे. या संघाला सर्वसामान्य व्यक्तींबरोबर लक्ष्मीपुत्र जरी देणगी देत असले तरी त्यांचे कामकाज स्वामीजींच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच चालते.
३) रामकृष्ण संघ पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारत व जगभर मानवी संस्कृतीवर नसíगक आपत्ती किंवा त्यासारखीच इतर संकटे आली तर सतत मदतकार्य करीत असतो. महाराष्ट्रात कोयना-किल्लारी भूकंपापासून २६ जुलच्या मुंबई महाप्रलयात रामकृष्ण संघाने भरीव कार्य केलेले आहे. ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्हिताय’ या बोधवाक्याला अनुसरून या सेवाकार्याची फारशी जाहिरात होत नाही. ‘जीवन विकास’ या रामकृष्ण संघ, नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या मासिकात निरनिराळ्या मदतकार्य प्रकल्पाचा ओझरता उल्लेख पाहावयास मिळेल.
४)  स्वामीजींच्या काळातील संघाच्या कार्यशैलीपासून सद्य रामकृष्ण संघाची वाटचाल कशी झाली याबाबत वि. रा. करंदीकरांचा ‘रामकृष्ण संघाचा इतिहास’ हा ग्रंथ उद्बोधक प्रकाश टाकू शकेल .
– पंकज कुलकर्णी, बोरिवली पश्चिम

पं. चिमोटे यांच्या उपेक्षेची खंत
पं. मनोहर चिमोटे निधनापूर्वी दोन ते तीन वर्षे जवळपास अंथरुणाला खिळूनच होते. देशातल्या श्रेष्ठतम वादकांत त्यांचे नाव आदराने घेता येईल इतकी त्यांची योग्यता होती. ‘संवादिनी’ हे नाव खुद्द पंडितजींनी त्यांच्या सुधारित हार्मोनियमला दिले होते. हे वाद्य खरे तर त्यांनीच घडवले होते. आयुष्यात त्यांची घोर उपेक्षा झाली ही खंत आहे.
-अशोक राजवाडे