उत्क्रान्तियात्रा ही एक सहकाराची यशोगाथा आहे. ही उज्ज्वल परंपरा सांभाळत मनुष्यजात उत्क्रान्तीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकेल, सगळे अंतरिक्ष जीवसृष्टीने फुलवू शकेल.

माझ्या नाती- तारा आणि रेवती- नेहमीप्रमाणे मला नव्यातला नवा बॉलीवूड नाच शिकवत होत्या- लुंगी डान्स. नाचता नाचता मी कान टवकारले, कारण त्या गात होत्या- घर जा के गूगल कर लो, मेरे बारे में sam08विकिपीडिया पे पढ लो! म्हणजे मी चक्क पंधरा वर्षांपूर्वी मेनार्ड स्मिथांनी भाकीत केलेल्या उत्क्रान्तियात्रेतल्या दहाव्या स्थित्यंतराचा साक्षी होतो. त्यांनी दाखवले होते की, पहिल्या नऊ स्थित्यंतरांत जीवसृष्टी अधिकाधिक शिताफीने, जास्त जास्त जटिल माहिती हाताळू लागते, बोधप्रचुर बनत जाते आणि सुचवले की, दहाव्या स्थित्यंतरात सर्व मानवी ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचू लागेल. ही सारी स्थित्यंतरे घडतात सहकारातून. जीवन हे अखेर विविध रेणूंच्या सहकारातूनच अवतरले. वनस्पतींच्या प्रगत पेशी निर्माण झाल्या आíकया व सायानो बॅक्टेरियांच्या सहकारातून. वनस्पती व बुरशींच्या सहकारातून वनराजी जमिनीवर पसरू शकली. वनस्पतींशी परागीकरणासाठी हातमिळवणी करत मधमाश्यांसारखे समाजप्रिय कीटक अवतरले. एकमेकींना परागाच्या स्रोतांची माहिती देण्यासाठी मधमाश्यांनी नाचबोली शोधून काढली. यापुढे जाऊन मानवाने बोधसंचयाचे अप्रतिम साधन अशी एक भाषा विकसित केली. या मानवी भाषेची उत्पत्ती हे मेनार्ड स्मिथांचे नववे स्थित्यंतर होते. यातून अवतरले ‘दुणावे की देता, किमपि न सरे लेशही कदा’ असे एक आगळे संसाधन, विद्याधन. मेनार्ड स्मिथांनी सुचवले की, या विद्याधनाचा विकास होता होता आज जे नवे माहिती-संचार तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे, त्यातून दहावे स्थित्यंतर होईल : मानवाचा सारा सारा बोधसंचय सर्व मानवांना सहजी, विनासायास उपलब्ध होणे.

विकिपीडियाने याच दहाव्या स्थित्यंतराची मुहूर्तमेढ रोवली आहे. या माध्यमातून मानवाचा सारा बोधसंचय सर्वाना मोफत उपलब्ध होण्याची सुरुवात होते आहे. अर्थात या बोधसंचयात सगळेच काही गणित-भौतिकशास्त्रांसारखे वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आहे असे बिलकूलच नाही. विशेषत: अर्थव्यवहाराबद्दल, समाजरचनेबद्दल खूपसे अगदी एकांगी, जबरदस्त दिशाभूल करणारे विवेचन आज प्रचारात आहे. हे सांगते की, मानवाला फक्त स्वार्थ दिसतो. तो जे काही करतो ते सारे निव्वळ पसा कमावण्यासाठी. पोटपूजा आणि बाजारहाटांची पेठपूजा हीच मानवी आयुष्याची इतिकर्तव्ये आहेत! या पेठपूजकांनी बजावले होते की, विकिपीडिया हा ज्यात भाग घेण्यात कोणालाही आíथक लाभ नाही, असा अतोनात भोळसट उपक्रम आहे. तो कोलमडणारच. विकिपीडिया हे आहे संगणकविश्वाने निर्माण केलेल्या जगद्व्यापी आंतरजालावर- वर्ल्ड वाइड वेबवर- आरूढ झालेले सर्वाना विनामूल्य उपलब्ध असलेले, कोणत्याही जाहिराती न स्वीकारणारे असे एक आगळे ज्ञानभांडार. असे विद्याधन सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्यावर विद्य्ोचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी असे लोकांना काहीच हसत हसत मिळू नये, सगळ्या विद्याधनावर कोणा ना कोणाचा कॉपीराइट हक्क राहावा, पसे मोजल्याशिवाय काहीही कोणाच्या हाती लागू नये याची शर्थ सुरू केली; परंतु पशाचा लोभ न धरता समाजासाठी काही तरी करावे, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीही समाजात असतातच. अशांतल्याच प्रतिभावान माहितीतज्ज्ञ वॉर्ड किनगहॅमने ‘विकी’ सॉफ्टवेअर घडवले. हे वापरून आंतरजालावर पोहोचू शकणाऱ्या कोणालाही दुसऱ्या कोणीही बनवलेल्या साहित्यात सुधारणा करता येतात, चुका दुरुस्त करता येतात. ही प्रणाली वापरत सारे जण नवनवे साहित्य एकमेकांच्या मदतीने घडवू शकतात. किनगहॅमने नि:स्वार्थीपणे आपले विकी तंत्रज्ञान सगळ्या जगाला विनामूल्य उपलब्ध करून दिले. मुक्त ज्ञानकोशाच्या प्रवर्तकांनी ठरवले की, समस्त आम आदमींना आपण या मुक्तकोशाच्या सत्कर्माला हातभार लावण्याचे आवाहन करू या. सुरुवातीला चुका होतील, पण सर्वानाच इतरांच्या चुका दाखवायला खूप आवडते. तेव्हा पंडितांना आवाहन करू या, सामान्य जनांच्या लेखनातल्या चुका धुंडाळा, त्या दुरुस्त करा. विकी प्रणालीत अशा चुका झटाझट दुरुस्त करता येतात. या सर्वसमावेशक विकिपीडिया उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळून हे ज्ञानभांडार दिवसेंदिवस इतके समृद्ध झाले आहे की, आज त्याची मजल अनेक भारतीय भाषांसहित २८७ भाषांमध्ये पाच कोटी लोकांच्या योगदानातून लिहिलेले शाहरुख खानसहित अनेक विषयांवरचे साडेतीन कोटी लेख इथपर्यंत पोहोचले आहे. आंतरजालावर विकिपीडियाप्रमाणेच ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीचे इतरही अनेक सर्वसमावेशक, स्वयंस्फूर्त, पशाची अपेक्षा न करता केवळ बहुजनहिताय झटणारे उपक्रम यशस्वी झालेले आहेत. उघड आहे की, मनुष्य केवळ स्वार्थापोटी, पशासाठीच झटतो म्हणून सगळ्याची खरेदी-विक्री बाजारपेठेच्या माध्यमातूनच करत राहिले पाहिजे, सामाजिक बांधीलकी वगरे झूट आहे, असे म्हणणाऱ्या संकुचित मनाच्या अर्थतज्ज्ञांची मांडणी सपशेल चुकीची आहे. जग स्वार्थ, स्पर्धा, संघर्षांच्या मगरमिठीतून बाहेर पडू शकेल. सतत अधिकाधिक वीज जाळणे, पाणी नासवणे, प्लास्टिकच्या कचऱ्याने भरलेले उकिरडे पोसणे, वेडेपणे रंग उजळवणारी मलमे चोपडत त्वचेवर अत्याचार करत राहणे, हा काही खरा शहाणपणा नाही हे पटवून घेता येईल. सर्व मानवजातीला काव्य- शास्त्र- ज्ञान- विज्ञान- कला- क्रीडा- विनोदाचा भरपूर रसास्वाद घेण्याची संधी देणारी एक समृद्ध जीवनशैली उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलता येतील.

मग आपण या विश्वाबद्दल एका वेगळ्याच दिशेने विचार करू शकू. आज स्पष्ट झाले आहे की, जीवसृष्टीची लवचीकता अक्षरश: अमर्याद आहे. असे जर असेल तर जीवन काही ग्रहांच्या परिसरांतच सीमित का असावे, ते अंतरिक्षात तगून राहायला काय हरकत आहे? काही वर्षांपूर्वी फ्रीमन डायसन या शास्त्रज्ञाने हा प्रश्न विचारला. अंतरिक्षात जगायला जीवांना तीन समस्यांना तोंड द्यायला लागेल; त्या म्हणजे आत्यंतिक थंडी, पूर्ण पोकळी व गुरुत्वाकर्षणाचा अभाव; पण सगळा शास्त्रीय पुरावा तपासून डायसन दाखवून देतो की, या तीनही आव्हानांना तोंड देऊ शकणारे जीव आपण कल्पनासृष्टीत तरी बनवू शकतो. मानवाची नव्या नव्या प्रकारचे जीव रचण्याची क्षमता सातत्याने वाढत आहे. डायसन सुचवतो की, एक दिवस अंतरिक्षात जगू शकेल, एवढेच नव्हे तर प्रजोत्पादन करू शकेल असे जीव आपण घडवू शकू; नव्हे, असे जीव घडवून सारे अंतरिक्ष जीवनमय करणे हे मानवजातीचे कर्तव्य आहे. एकदा असे जीव अंतरिक्षात पोचले, की त्यांची उत्क्रान्ती आपोआप होत राहील आणि कालक्रमाने त्यांचे वैविध्य सहजगत्या बहरेल. त्याला मानवाच्या अधिक हस्तक्षेपाची आवश्यकता राहणार नाही. हे असू शकेल उत्क्रान्तियात्रेतले अकरावे स्थित्यंतर.
उत्क्रान्तियात्रेत केव्हा ना केव्हा मानवजात नष्ट होणे हे तर अटळ आहे. आज अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जातीमागे शंभर जाती लयाला गेल्या आहेत. मनुष्यजात काही खास अमरपट्टा घेऊन अवतरलेली नाही. तीही कालाच्या उदरात एक दिवस विलीन होणारच; पण त्यापूर्वी जर मानवाने फ्रीमन डायसनच्या कल्पनांच्या भरारीप्रमाणे साऱ्या अंतरिक्षाला फुलवण्यास सुरुवात केली असेल, तर मानवजात या विश्वावर आपला खास ठसा उठवूनच लयाला गेलेली असेल.
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.