करिश्मा मंत्रमुग्ध करतो. थक्क करून टाकतो. पण समाजाला गरज असते ती त्या पलीकडे जाणाऱ्या नेतृत्वाची..
उत्क्रांतीमध्ये माणसाने काही गुण आत्मसात केले व वाढविले. नेतृत्व हा त्यातील महत्त्वाचा गुण. तो कसा विकसित झाला याच्या खुणा उत्क्रांतीच्या इतिहासात सापडतात. मात्र एखाद्या व्यक्तीमध्येच तो का उद्भवतो किंवा जोरकस होतो हे अद्याप सांगता येत नाही. नेतृत्वगुणाची वैशिष्टय़े दाखविता येतात, ती आत्मसात कशी करायची याचे मार्गदर्शन करता येते. व्यवस्थापन महाविद्यालयात हेच करतात. मात्र असे मार्गदर्शन घेणारा माणूस नेता होईलच अशी खात्री देता येत नाही.
करिश्मा असलेले नेतृत्व हे तर त्या पलीकडील गूढ आहे. साध्या नेत्याबद्दल निदान काही व्याख्या करता येतात. पण करिश्मा असलेल्या नेतृत्वाला नेमक्या चौकटीत बसविता येत नाही. लोक त्याच्यावर फिदा असतात. ते का फिदा होतात हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी ते झुंडीने गोळा होतात. त्याच्या मृत्यूनंतर आईबाप गेल्यासारखे दु:ख लोकांना होते. लोकांना त्याच्याकडून काही तरी मिळते. हे काही तरी मिळणे मुख्यत: भावनिक स्तरावरचे असते. स्थैर्याची, प्रेमाची, आत्मीयतचेची भावना ही माणसाची फार मोठी गरज आहे. अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजांवरही ती वर्चस्व गाजविते. करिश्मा व माणसाच्या भावनिक गरजा यांचे घट्ट नाते आहे. या भावनिक गरजा जिथे पुरविल्या जातात तेथे माणसे सहज आकर्षित होतात. त्या व्यक्तीकडे ती खेचली जातात.
नेता निर्माण होतो कारण आपल्याला त्याची गरज असते. अनुयायी होण्याची प्रेरणा आपल्यात जन्मजात आहे. कारण अनुयायी बनणे सोपे असते. त्यासाठी विचार करावा लागत नाही. दिशा हरविली की माणसाला दिशादर्शक लागतो. हा दिशादर्शक योग्य दिशा दाखवितो की नाही याची त्याला फिकीर नसते. त्याला फक्त त्याच्या भावनिक गरजा पुरविणारी दिशा हवी असते. विज्ञानात दिशा दाखविण्यासाठी होकायंत्र वापरतात. त्याचा आधार घेऊन अन्य दिशा निश्चित करता येतात. मानसिक प्रांतात असे शास्त्रशुद्ध होकायंत्र नाही. त्यामुळे या प्रांतात माणसांचा अतोनात गोंधळ उडतो. माणसाच्या बहुतांश समस्या या मानसिकच असतात. तेथे होकायंत्र सापडले नाही की स्वत:चे होकायंत्र तयार करण्यापेक्षा तो दुसऱ्यावर विसंबून राहतो. नेत्याकडे असे होकायंत्र असते. कुणी धर्माला होकायंत्र बनवितो, कुणी मार्क्‍सला. कोणी भांडवलशाहीला तर कुणी हुकूमशाहीला. असे होकायंत्र सापडले की नेता जन्माला येतो. हा नेता भावनिक गरजाही पुरवू लागला तर तो करिश्म्याकडे वाटचाल करतो.
माणसाला दिशा हवी असते व नेता बोट दाखवून दिशा सूचित करतो. बोट दाखवून दिशादिग्दर्शन करणे हे केवळ माणसाचे वैशिष्टय़ आहे. बोट दाखविल्याने प्राणी त्या दिशेला पाहत नाही. वस्तू फेकली तर पाहतो. पण आईने बोट दाखविले तर तीन महिन्यांच्या मुलाचे डोळेही त्या दिशेने जातात. अनुयायी दिसले की नेते हात का उंचावतात किंवा नेत्याच्या हाताचे अनुयायांना आकर्षण का वाटते, याचे कारण या आपल्या जैविक घडणीमध्ये दडलेले आहे.
हे दिशादिग्दर्शन शास्त्रशुद्ध असतेच असे नाही. मानवी इतिहासात आजपर्यंत असंख्य नेते येऊन दिशादिग्दर्शन करून गेले. पण माणसामध्ये फरक पडलेला नाही. उलट त्याच्या समस्या अधिकाधिक बिकट होत गेलेल्या आहेत. शास्त्रशुद्ध दिशादिग्दर्शन अगदी क्वचितच होते. शास्त्रशुद्ध दिशादिग्दर्शन मिळाले तरी त्यानुसार वाटचाल करणे हे बरेच जिकिरीचे असते. त्यामध्ये बरेच धक्के सोसावे लागतात. साहस करावे लागते. अपयशाची भीती असते. यापेक्षा मनाला गुंगी आणणारे, मस्तीत ठेवणारे, भ्रांत दिशादिग्दर्शन माणसाला प्रिय असते. माणूस नेहमी सुखाकडेच खेचला जातो. अशा सुखकर उबदार भविष्याची, सुरक्षेची ऊब नेता देऊ लागला की तो करिश्मा असलेला नेता ठरतो.
विपरीत परिस्थिती आली किंवा परिस्थिती विपरीत आहे अशी भावना समाजात निर्माण झाली की करिश्मा असलेल्या नेत्याची गरज उत्पन्न होते व बहुधा त्या वेळी असा नेता पुढे आलेला इतिहासात दिसतो. पैसा आणि सत्ता या दोन्ही स्तरांवर आपण कोंडीत सापडलो आहोत व लायकी असूनही आपल्याला हवे ते मिळत नाही अशी भावना मराठी माणसात तयार झाली. अटकेपार झेंडे लावण्याचा इतिहास त्याच्या मनात ताजा होता, पण लोकमान्य टिळकांनंतर राष्ट्रीय स्तरावर हुकूमत गाजविणारे नेतृत्व महाराष्ट्रात निर्माण झाले नाही. डॉ. आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोन स्वतंत्र विचारांचे नेते महाराष्ट्राने दिले पण त्यांना त्यांच्या हयातीत राष्ट्रीय स्तरावर अनुयायीवर्ग मिळाला नाही. यातून मराठी माणसात न्यूनगंडाची भावना तयार होऊ लागली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या उचापतींमुळे या भावनेला आक्रमक आविष्काराची गरज निर्माण झाली. ही गरज पूर्ण करण्याचे धाडस प्रस्थापित नेत्यांमध्ये नव्हते. ते धाडस शिवसेनेने केले व शिवसेना मुंबईत एकदम लोकप्रिय झाली. परिस्थिती व नेता यांच्या परस्परसंबंधांची अशी अनेक उदाहरणे दाखविता येतात.
परिस्थितीबरोबरच करिश्मा आणि व्यक्तिमत्त्व यांचा जवळचा संबंध आहे. करिश्मा असलेल्या नेत्यामध्ये चुंबकीय जादू असते. ती कुठून येते हे विज्ञानाला अद्याप समजलेले नाही. भारतीय तत्त्वज्ञानात याचे विवेचन आहे. मात्र ते तात्त्विक आहे. शास्त्रीय नाही. या नेत्याच्या सहवासात आले की तो केवळ आपल्यासाठीच आहे अशी भावना मनात आपोआप निर्माण होते. अनुयायाला सलगीने वागविण्याचे कौशल्य अशा नेत्याकडे जन्मजात असते. त्यांच्या आत्मीयतेच्या, जवळकीच्या भावनेत समोरचा माणूस अक्षरश: न्हाऊन निघतो. त्याबरोबर असे नेते अनुयायांवर प्रचंड विश्वास असल्याचे दाखवितात. ते अनुयायांचे खरोखर भले करीत असोत वा नसोत, नेत्याचा आपल्यावर प्रगाढ विश्वास आहे असे अनुयायांना सतत वाटते. अनुयायांना असे वाटत राहील अशा कृती हा नेता वारंवार करतो.
यासाठी मदत होते ती भाषेची. करिश्मा आणि भाषा यांचाही जवळचा संबंध आहे. भाषा हेही निसर्गातील एक गूढ आहे. त्याचे सामथ्र्य विलक्षण आहे. करिश्मा असलेल्या नेत्याची भाषा विलक्षण संवादी असते. आपल्या अनुयायांचा बुद्धय़ांक व भावनांक काय आहे याची अंगभूत जाण असल्याने त्यांचे लक्ष खिळवून ठेवील अशी भाषा तो वापरतो. त्यासाठी भाषेला वाकवितो. व्यक्तिमत्त्वामुळे आकर्षित झालेल्या अनुयायांना बांधून ठेवण्याचे काम नेत्याची भाषा करते. या भाषेतून इतिहासातील काही तेजस्वी उदाहरणे पुढे केली जातात. आपण सर्वसामान्य नाही, आपण वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत ही भावना यामुळे निर्माण होते. शिवाजी महाराजांचा उल्लेख म्हणूनच वारंवार होतो. कठीण परिस्थितीत सतत अपयशाचे चटके घेत असताना ही भावना फारच सुखकर वाटते. श्रेष्ठत्वाची ही भावना आपल्या पक्षात, गटात, संस्थेत सतत निर्माण होईल याची दक्षता करिश्मा असलेला नेता घेतो. संघटनेत असल्याचा अभिमान अनुयायाच्या मनात निर्माणच झाला नाही तर करिश्मा होऊच शकत नाही.
मात्र नाव संघटनेचे घेतले तर प्रत्यक्षात असा अभिमान प्रत्येक अनुयायाला फक्त ‘आपल्याच’ नेतृत्वाबद्दल वाटेल ही दक्षताही करिश्मा असलेले नेते घेतात. अनुयायी संघटनेत असला तरी तो नेत्याशी बांधलेला असतो. यामुळे अशा संघटनेत वाद झाले तरी ते प्रथम क्रमांकासाठी नसतात तर नेता कुणाचे ऐकतो यावरून होतात. नेत्याने स्वत:ला विठ्ठल बनवून घेतल्याखेरीज बडव्यांमुळे फूट पडू शकत नाही.  
कमी-अधिक करिश्मा असलेल्या अशा अनेक नेत्यांची उदाहरणे आपल्याला आजूबाजूला मिळतील. लाखोंचा जनसागर खेचून घेणारे नेते महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक देशात अशी उदाहरणे आहेत. जखम भळभळत असताना आरामदायी मलम जसे सुखकर वाटते तसे हे नेतृत्व असते. ते मनाला दिलासा देते. उभे राहण्यासाठी जोर देते. मनाला सांभाळून घेते. त्रास देणाऱ्या परकीयांवर दरडावते. लहान मूल झालेल्या समाजात प्रेमळ बापाची भूमिका उत्तम वठविते.
पण त्यातून समाजातील समस्या सुटत नाहीत. समस्या सोडविण्यासाठी करिश्मा असलेले नेतृत्व क्वचितच उपयोगी पडते. तेथे गरज असते परिवर्तन करणाऱ्या नेतृत्वाची. ‘ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिप’ असा शब्द त्यासाठी वापरतात. करिश्म्यामुळे समाज मंत्रमुग्ध होतो, सश्रद्ध होतो, पण त्यात बदल होतोच असे नाही. परिवर्तनशील नेतृत्व हे समाजात बदल करण्यासाठी धडपडत असते. अशा नेतृत्वाकडेही करिश्मा असतो. मात्र त्याचा वापर स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी होत नाही तर समाजात बदल घडवून आणण्यासाठी केला जातो. असे नेते समाजाची मानसिकताच बदलून टाकतात. त्यांच्या करिश्म्याला जोड असते ती उच्च नैतिक मूल्यांची. ते नुसती प्रेरणा देत नाहीत तर आपल्या अनुयायांना कृती करायला लावून ती प्रेरणा समाजाच्या अंगी भिनवीत नेतात. शिवाजी महाराज हे याचे सर्वोच्च उदाहरण. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ही अलीकडील उदाहरणे. धार्मिक क्षेत्रात गौतम बुद्ध व ज्ञानेश्वर ही आपल्या ओळखीची उदाहरणे.
करिश्मा असलेले नेते सातत्याने येत असतात. उणीव असते ती परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेत्यांची. समाजाला गरज दोघांचीही असते. परिस्थितीनुसार प्रत्येकाचे महत्त्व कमी-जास्त होत असते. मात्र करिश्मा असलेल्या नेत्यापेक्षा परिवर्तनशील नेत्याचे होकायंत्र अधिक अचूक असते. कारण ते उच्च नैतिक मूल्यांवर बसविलेले असते. लाखोंच्या जनसमूहाला सहज आपलेसे करणाऱ्या ‘कॅरिश्मॅटिक लीडर’ला आदराने वंदन जरूर करावे. मात्र त्याचे होकायंत्रही तपासून पाहावे.
मुख्य संदर्भ : रोनाल्ड रिजिओ,
 मार्क व्हॅन फूट व कॉन्गर या संशोधकांचे ‘लीडरशिप क्वार्टरली’ या जर्नलमधील व ‘सायकॉलॉजी टुडे’ या साप्ताहिकातील लेख.