आपण सर्वसामान्य माणसं जन्मभर र्कम करतोच, पण ती आपल्या ओढीनुरूप, मनाच्या घडणीनुसार होतात. त्यामुळे प्रत्येक कर्म जसं करायला पाहिजे तसंच पार पडतंच, असं नाही. कर्म करताना त्याच्या हेतूचं भानही टिकतंच असं नाही. त्यामुळे अनेकदा आपली र्कम ही गुंता ठरतात. संत सहजभावानं कर्म करतात. त्या कर्मात त्यांची ओढ नसते. ओढ केवळ भगवद्भावाकडेच असते. प्रत्येक कर्माचा हेतू ते जाणतात आणि त्या हेतूच्या पूर्तीइतपतच कर्म ते करतात. म्हणून त्यांची कर्मे ही पसारा होत नाहीत, ओझं होत नाहीत. उलट कर्म अचूकपणानं करीत असताना त्यांच्या प्रभावातून अलिप्त रहात जीवन कसं जगायचं, हे संतच स्वत: कृती करून दाखवतात. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे- ‘‘अर्भकाचेसाठीं। पंतें हातीं धरिली पाटी।। तैसे संत जगीं। क्रिया करूनी दाविती अंगीं।।’’ तेव्हा आपण करतो ती सामान्य कर्मे संतदेखील करतात, पण ती आटोपशीर, अचूक आणि हेतू पूर्ण करणारी असतात. त्यामुळेच त्या कर्माचा प्रभावही मनावर पडतो. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्यानुसार कर्म केलं तर कर्माचा गुंता न होता, पसारा न होता आवश्यक तेवढं कर्म कसं सहजतेनं पार पाडता येतं, हे शिकता येतं. तेव्हा संत कर्म टाळत नाहीत, उलट त्यांना विशेषत्वानं कर्म करावी लागतात, हे सांगणारी ही झाली ‘‘विशेषें आचरावें। लागे संती।।’’या चरणाची एक बाजू. आता हा ‘विशेष’ शब्द मार्मिक आहे आणि त्यामुळेच या चरणाची दुसरी बाजू मोठी मनोहर आहे. ती म्हणजे, संत विशेषत्वानं कर्म करतातच, पण ते विशेष र्कमही करतात किंवा त्यांची कर्मे काही विशेष हेतूसाठीही असतात! संत-सद्गुरूंच्या कर्माची ही बाजू मोठी गूढ आहे. वरकरणी ही कर्मे अगदी सामान्य भासतात. त्या कर्मातली विशेषता वरकरणी जाणवतही नाही, पण ती ज्याच्यासाठी असतात, ज्याच्याकरवी करून घेतली जातात किंवा जो त्यांचा साक्षीदार असतो त्याच्या आंतरिक जडणघडणीत या विशेषकर्माचा मोठाच वाटा असतो. काही कर्माचं मोल केवळ ती ज्याच्यासाठी केली जातात त्यालाच अगदी आतून उमगतं. ती र्कम सद्गुरूंवरील प्रेम, विश्वास वाढवतात. स्वामी विद्यानंद लिहितात- १५ ऑगस्ट १९६८चा दिवस. मी (पांडे) गांधी आणि काणे या स्नेह्यांसोबत संध्याकाळी रत्नागिरीस पोहोचलो. एसटीतील मंडळी भराभर उतरत होती. आम्ही थोडेसे गोंधळलो होतो. नवखा प्रदेश, कोकणात प्रथमच आलेलो. पावसला कसं जाता येईल, या विचारात होतो. तोच बाहेरून आवाज आला, ‘गाडीत पांडे आहेत का?’ मला आश्चर्याचा धक्काच बसला. तोच प्रश्न आला, ‘गाडीत गांधी आहेत का?’ गांधी बुचकळ्यात पडले तोच प्रश्न आला, ‘गाडीत कुणी काणे आहेत का?’ आमच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावर उरला नाही. गाडीतून उतरलो. बाहेर रत्नागिरीचे मालवणकर हे स्वामीभक्त उभे होते. आमचा परिचय नव्हता. ते म्हणाले, ‘‘दुपारीच स्वामींकडून निरोप आला की संध्याकाळच्या गाडीने पांडे, गांधी व काणे असे तिघे प्रथमच येत आहेत, त्यांना उतरवून घ्या!’’ हा प्रसंग या तिघांच्या मनावर कोरला न गेला, तरच नवल!