चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या ‘कथाकथन’ कार्यक्रमात पहिली कथा सांगणाऱ्या कथाकाराने वसंत सबनीस यांच्या ‘खांदेपालट’ कथासंग्रहात समाविष्ट असलेली ‘खांद्याची गोष्ट’ ही कथा जणू काही आपणच लिहिली असल्याच्या झोकात सांगितली. संमेलनातल्या कथाकथनात स्वत: लिहिलेली कथाच सांगितली जावी असा आजपर्यंतचा संकेत असताना, दुसऱ्याची कथा त्याचा नामोल्लेख न करता सांगून मोकळे होणे हे ‘कथाचौर्य’ नाही काय? महामंडळाने कथाचौर्य केलेल्या लेखकाला जाब विचारायला हवा.
जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो तो हा की, सुप्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार आपल्या कथाकथन कार्यक्रमात सर्वश्री आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी यांच्या कथा सांगतात, पण त्या सांगण्याआधी मूळ लेखकांचा आवर्जून उल्लेखही करतात.
विजय कापडी, गोवा

अपप्रसिद्धी आणि दहशत
भाजप आणि रा. स्व. संघ यांच्यावर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. वास्तविक पाहता िशदे यांच्या आधी चिदम्बरम आणि शरद पवार यांनीही वाढत असणाऱ्या उजव्या दहशतवादावर कित्येकदा भाष्य केले होते. स्वामी असिमानंद, कर्नल पुरोहित, ठाकूर प्रज्ञासिंग इ. याच विचारसरणीतून आलेले अनेक जण समझोता एक्स्प्रेस, मालेगाव, नांदेड, नवी मुंबई, मक्का मस्जिद या ठिकाणी झालेल्या स्फोटांसंदर्भात झालेल्या आरोपांवरून जेलमध्ये आहेत.
शहीद हेमंत करकरे यांनी सर्वप्रथम हा पर्दाफाश केल्यावर त्यांना शिव्या देणारे कोण होते? ठाकूर प्रज्ञासिंग कोर्टात आल्यावर त्यांच्यावर पुष्पवर्षांव करणारे कोण होते?
िशदे यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने कसाबला फासावर लटकवले, तेव्हा किती जणांनी त्यांचे कौतुक केले? एका मराठी गृहमंत्र्याने मराठी मातीवर झालेल्या हल्ल्याचा पाकिस्तानी मारेकरी क्रूरकर्मा अजमल कसाब यास फासावर टांगण्याचे कार्य पूर्ण केल्यावर किती ‘मराठी एके मराठी’ करणाऱ्यांनी डंका वाजविला? राज ठाकरे गडकरींची पक्षाध्यक्षपदावरून गच्छंती झाल्यावर मराठी लोकांची दिल्लीत होणारी ससेहोलपट बोलून दाखवितात; पण कसाबच्या शिक्षेनंतर ‘मराठी’ गृहमंत्री िशदेंचे साधे अभिनंदनदेखील करीत नाहीत. पाकिस्तानी कसाबला मृत्युदंड दिल्यावर पाकिस्तानात िशदे व्हिलन झाले होते की हीरो? ..मग आता ‘उजव्या’ दहशतवादावर बोलताच ‘पाकिस्तानात हीरो’ अशी त्यांची अपप्रसिद्धी करण्यात कोण धन्यता मानते?  
रविकिरण िशदे

असून अडथळा, नसून खोळंबा
बारावी (विज्ञान) – २०१३ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक म्हणजे ‘असून अडथळा नसून खोळंबा’ याची प्रचीती आणून देणारा प्रकार वाटतो. परीक्षा मंडळाने आता यापुढे तरी सर्व संबंधित परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि  जीवशास्त्र यांच्या अभ्यासाला तीन-चार दिवस वेळ मिळेल अशा बेताने आखणी करावी.
विदूला बसनाक, कांदिवली.

आमचे लोकप्रतिनिधी नक्की कुणाचे?
गेल्या काही दिवसांत मुंबईत घडलेल्या घटनांमुळे आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मतदारांची किती काळजी आहे हे दिसून येते. सर्वप्रथम दहिसरमध्ये महापालिकेने अनधिकृत झोपडय़ा तोडल्यानंतर लगेच लोकप्रतिनिधी निषेध करायला पुढे आले. त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. आज मुंबईतल्या मध्यमवर्गीय माणसाची, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा कोणतीही भाषा बोलणारा असला तरी, मुंबईमध्ये घर घेण्याची ऐपत नाही. तो मुंबईच्या बाहेर कुठे तरी दूर कर्ज काढून, उसनवार पसे उभारून घर घेतो. अशा वेळी कोणीही येऊन सरळ शासकीय किंवा प्रतिबंधित जमिनीवर झोपडी बांधतो. कालांतराने त्यांना पाणी, वीज अशा सर्व सुविधाही मिळतात. अशा वेळी जर शासनाने कार्यवाहीचा बडगा उचलला तर हे लोकप्रतिनिधी त्या अनधिकृत झोपडय़ांसाठी म्हणजेच आपल्या हक्काच्या मतदारांसाठी आवाज उठवतात. का?
दुसरी घटना वसंत ढोबळेसाहेबांची. त्यांचा गुन्हा तर काय, त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम हाती घेतली. सदर घटनेस फेरीवाल्याच्या मृत्यूची काळी किनार लागली; परंतु पूर्ण प्रकरणाची शहानिशा न करताच केवळ या अनधिकृत फेरीवाल्यांच्या लोकप्रतिनिधींनी निषेध केल्यावर त्यांची तडकाफडकी बदली झाली. का? हे लोकप्रतिनिधी नक्की कोणाचे? रोजच्या जीवनात असंख्य धक्के खाणाऱ्या, तरी इमानेइतबारे सर्व नियम पाळत कर भरणाऱ्या जनतेचे की मुंबई आपल्याच मालकीची समजून तिची दुर्दशा  करणाऱ्या अनधिकृत व्यक्तींचे?  
हर्षद गुरव

‘ज्ञानरचनावाद’ चुकीचा कसा?
‘असरचे निदान आणि असरकारी उपाय’ जाने. २०१३चा काळपांडे यांचा लेख. त्यात खालील वाक्य आहे : ‘ज्ञानरचनावादावर आधारलेली शिक्षणपद्धती म्हणजे जादूची कांडीच आहे, असा या मंडळींचा ठाम, परंतु पूर्णपणे चुकीचा विश्वास आहे.’  मला शिक्षणशास्त्राची एक अभ्यासक म्हणून असे वाटते की, त्यांच्या वरील मताचे त्यांच्यासारख्या तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्तीने स्पष्टीकरण करावे. म्हणजे ज्ञानरचनावादावरचे त्यांचे मूलभूत चिंतन सर्वासमोर यायला मदत होईल. तसेच आमच्यासारख्या अभ्यासक वाचकांची आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची असे एखादे वाक्य वाचल्याने जी गोंधळाची अवस्था होते ती कमी व्हायला मदत होईल.
डॉ. राजश्री बाम, संगमनेर

वर्मा अहवालात नवी उत्तरे, पण प्रश्न कायम
महिलांवरील बलात्कार आदी गुन्ह्यांसंदर्भातील कायदे अधिक सक्षम करण्यासाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती जगदीशशरण वर्मा समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातील प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या शिफारशींवर नजर टाकल्यास सामूहिक बलात्कार अथवा अल्पवयीन बालिकांवर केलेल्या बलात्कारांचे गांभीर्य त्यांनी कमी लेखले, असे जाणवते. वास्तविक, महिलांना सावज मानून कोणत्याही महिलेला टिपू शकणारे, बालिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अन्य कुणी धजावू नयेत यासाठी या दोन प्रकारांत फाशीचीच शिक्षा योग्य!
मात्र महिलांच्या सुरक्षिततेबाबतची सांगड लोकप्रतिनिधींशी घालताना ‘सार्वजनिक जीवनात शुचिता महत्त्वाची असल्याने देशातील ३१ टक्के खासदार, आमदारांवर दाखल असलेले विविध गुन्हे पाहू जाता नतिकता असलेल्याच उमेदवारांनी निवडणूक लढवावी, जेणेकरून महिला निर्भयपणे राजकीय हक्क बजावू शकतील’ हा उद्देश नमूद करीत निवडणुकीसाठी उभे राहणारे उमेदवार, आमदार, खासदार ते जाहीर करीत असलेली संपत्ती कॅगमार्फत तपासण्याची आणि त्यांच्यावरील गुन्ह्य़ांबाबतचे ते देत असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालय निबंधकांमार्फत प्रमाणित करण्याची शिफारस यथायोग्यच होय! कारण संपत्तीची पडताळणी होत नसल्याने व गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांना अटकाव होत नसल्याने, किंबहुना त्यांना प्रमुख राजकीय पक्षच पाठीशी घालत असल्याने अ(न)र्थकारण व गुन्हेगारी पोसली जाऊन मतदार-नागरिक असुरक्षिततेच्या सावटाखाली असतो आणि अशा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचे अभय असल्याने एरवीही समाजात वावरताना (विशेषत: त्यांच्या परिसरात) महिला अनामिक भीतीच्या सावटाखाली असतात.
किरण प्र. चौधरी, वसई.

असे कसे सुधारित वेळापत्रक?
बारावी विज्ञान शाखेचे जे नवीन (सुधारित) वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केले, त्यानंतरही आम्हा विद्यार्थ्यांचे खालील प्रश्न सुटले नाहीत.
१) जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी आमच्या हातात बारावी परीक्षेनंतरचे फक्त १५ दिवसच राहातात.
२) जीवशास्त्राचा पेपर संस्कृतच्या नंतर लगेच आहे! हाच क्रम उलटा असता तरी चालले असते.
३) ‘लास्ट रीव्हिजन’साठी तीन-चार दिवस पुरेसे असतात. नव्या वेळापत्रकात एकेक पेपर आठवडय़ाने आहे. इतके दिवस दिल्याने, जे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतच होते त्यांचा फायदा न होता उलट नुकसान होण्याची शक्यता आहे.
ओंकार सावंत, व्ही. जी. वझे महाविद्यालय, मुलुंड.
आदिती भगत, संकेत जाधव, रसिका पाटील, आरती मंकणी यांनीही अशाच आशयाची ईमेल पाठविली आहेत, तर ‘यापुढे तरी बदलू नका’ अशी विनंती ऋ तुराज पाटील याने मांडली आहे. ही सर्व ई-पत्रे इंग्रजीत होती.