यशस्वी होण्यासाठी नुसतीच स्मरणशक्ती आवश्यक नसते. काय लक्षात ठेवायचं हे कळावं लागतंच. पण ते कळता कळता काय विसरायचं..हेही कळावं लागतं.

सुंदर पिचाई गेल्या आठवडय़ात गुगलचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाला. एखाद्या भारतीयाची इतक्या मोठय़ा पदावर नियुक्ती होणं केव्हाही कौतुकास्पदच. सुंदर मूळचा चेन्नईचा.. मग आयआयटी करून तो अमेरिकेला गेला.. आणि १४ वर्षांपूर्वी गुगलमध्ये दाखल झाला..वगैरे सर्व तपशील एव्हाना छाप छाप छापला गेलाय. त्याच्या निमित्तानं कोण कोण भारतीय परदेशात जाऊन दिग्विजयी ठरलेत त्या यादीचंही जाहीर वाचन झालं. नवमाध्यमांत तर ते दोन दिवस दुसरा विषयच नव्हता चच्रेला. अशा चर्चात नवनवीन तरुणांना प्रेरणा मिळत असते आपणही असंच काही करायला हवं..याची. असो. मुद्दा सुंदरची नियुक्ती वगरेचा नाही.
तर तो आहे गुगलविरोधातील खटल्याचा. त्यात जो काही आदेश गुगलला देण्यात आला आहे, त्याचं गुगल पालन कसं करणार, याचा. ते पालन केलं की गुगल हे गुगल राहील का याचा.. आणि तसं ते राहावं यासाठी गुगलला जी काही कसरत करावी लागतीये..त्याचाही.
त्याच कसरतीचा भाग म्हणून गुगलचे शीर्षस्थ दर बुधवारी दुपारी एकत्र जमतात. या काही नेहमीच्या बठकांसारख्या बठका नसतात. नेहमीच्या बठकांत कसं गुगलचेच तंत्रज्ञ, भविष्याचा वेध घेऊ पाहणारे वगरे असायचे. तसं या बठकांचं नाही. या नव्यानं सुरू झालेल्या बठकांत गुगलच्या वरिष्ठांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ, बौद्धिक संपदावाले वगरे बरेच जण असतात. विषय एकच असतो.
आपण आपली विस्मरणाची क्षमता कशी वाढवायची?
समाजातल्या अजूनही गुगलग्रस्त न झालेल्यांना या संदर्भात थोडी माहिती द्यायला हवी.
झालंय काय की गुगलनं संगणकाची विचारक्षमता अनेक पटींनी वाढवून ठेवलीये. गुगलच्या उगमापर्यंत संगणक गुमानपणे आपण जे काही सांगू ते करायचा. आताही करतोच. पण आता या सांगकामेगिरीच्या जोडीला तो आपल्याला सल्लेबिल्लेही द्यायला जातो. म्हणजे गुगलच्या शोध खिडकीत समजा आपण एखादी माहिती शोधली आणि पुन्हा दोन दिवसांनी आपण त्या शोध खिडकीतनं आत गेलो तर काय होतं? तर हा संगणक पठ्ठा आपण जे काही विचारतोय ते सांगता सांगता आपण दोन दिवसांपूर्वी जी काही माहिती शोधली होती, त्याचा तपशील देतो, त्याच्या जोडीला तुम्हाला हे हवं का, ते हवं का विचारतो आणि एक पाऊल पुढे जाऊन आगाऊपणे आपल्याला भलतीच कसली शिफारस करतो. आणि आपण जर सराईत संगणक वापरकत्रे नसू तर आपसूक त्याच्या जाळ्यात अडकतो. अलगदपणे या स्थळावरून त्या स्थळाकडे आणि तिथून पुढे आणखी कुठे..असे अजागळपणे िहडत बसतो. आपल्याला कळतच नाही बराच काळ आपल्याला संगणकानं किती वापरून घेतलंय ते. म्हणजे आपण संगणकाला वापरायच्या ऐवजी संगणकच आपल्याला वापरायला लागलाय.. एखाद्या मोठय़ा मॉलमध्ये गेलो की जसं होतं तसंच हे. मूळ काम असतं छोटंसंच काही तरी. पण त्याची खरेदी राहते बाजूलाच. आपण आणखीनच काही तरी गळ्यात मारून परत येतो. नंतर..म्हणजे विचार केला तरच..जाणवतं ही इतकी खरेदी करायची काही गरजच नव्हती. गुगलचं हे असं होतं. बऱ्याच वेळानं कळतं..माहिती महाजालात हा इतका वेळ काही वाया घालवायची गरज नव्हती.
संगणकानं आपल्याला हे असं घोळात घ्यायची परंपरा सुरू झाली तीच मुळी गुगलच्या उदयापासनं. गुगलच्या आधी माहिती महाजालात शोधयंत्र असा प्रकारच नव्हता. ती गुगलची देणगी. ती इतकी सगळ्यांना भावली, रुजली की गुगल हा शब्द चक्क क्रियापदच बनून गेला. म्हणजे गुगलवर शोधणं, गुगलवर जाणं, गुगल वापरणं आदी सगळे शब्दप्रयोग कालबाह्य़ झाले. त्याच्या जागी एकच एक तयार झाला? गुगल करणं. हे इतकं सगळ्या संगणकीयांच्या जगण्याचा भाग झालं की मी गुगल करतो..तू गुगल कर..ही भाषाच बनली.
सुरुवातीला ते ठीक होतं. नवनवीन होतं. त्यामुळे नव्या शोधानं म्हणून एक अचंबित होणं असतं, ते होतं. पण गुगलची भूक अधिकाधिक वाढली. या शोधाच्या आधारे त्यांनी आणखी नवीन काय काय तयार केलं. इतके दिवस गुगल माहिती जालातली माहितीच द्यायचा. आता तो छायाचित्रंही द्यायला लागला. तेही ठीकच एक वेळ. पण नंतर गुगल लक्षात ठेवायला लागला..कोण काय, कसली माहिती शोधतंय ते. ही बाबही एक वेळ क्षम्य ठरली असती. कारण ती कुणालाच कळली नसती. पण ती कळली कारण गुगलचा आगाऊपणा. आपल्या शोध खिडकीत आलेल्याला तो जे काही मागतोय ते द्यायच्या ऐवजी त्यानं काय घ्यावं किंवा घेऊ नयं असं सांगायला गुगलनं सुरुवात केली..आणि मग हळूहळू अनेकांना जाणवायला लागलं..गुगल काय करतंय ते. किंवा काय करू पाहतोय ते.गुगलची पावलं कोणत्या दिशेनं पडतायत याची पहिली जाणीव झाली युरोपियनांना. अमेरिकनांपेक्षा युरोपीय मंडळी या असल्या बाबतीत आघाडीवर असतात. आपलं स्वातंत्र्य, खासगी आयुष्य, सार्वजनिक हित वगरे बाबी इतरांच्या तुलनेत युरोपियनांना जरा जास्त आणि लवकर कळतात. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा हाकाटी ठोकली! गुगल आमच्या खासगी आयुष्यात डोकावतंय.
अनेकांना हा मुद्दा पटला. तो अशा पातळीवर उचलला गेला की अखेर गुगलच्या विरोधात न्यायालयात खटलाच भरला गेला. त्याची बरीच सुनावणी वगरे चालली. हा दाखल करणाऱ्यांची एकच मागणी होती. गुगलची स्मरणशक्ती कमी करा. याचा अर्थ आम्ही काय शोधलं, काय पाहिलं, कोणत्या स्थळाला भेटी दिल्या..हे सगळं गुगलनं लक्षात ठेवायचं काहीही कारण नाही..आणि लक्षात ठेवून नंतर आम्हाला परत त्याची आठवण करून देण्याचं तर नाहीच नाही. युरोपीय स्वत:च्या हक्कांविषयी पक्के जागरूक. त्यामुळे गुगलग्रस्तांची ही तक्रार न्यायालयानं ग्राह्य़ धरली आणि गुगलला आदेश दिला..माहिती महाजालात येणाऱ्यांचा मागमूस असा जपून ठेवणं बंद करा..हा नागरिकांच्या खासगी आयुष्याचा भंग आहे.
दर बुधवारी आता गुगलचे वरिष्ठ भेटतात ते याच मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी. या आदेशाचं पालन करायचं तरी कसं हे नक्की ठरवण्यासाठी. तसं करायचं तर संगणकाची आज्ञावलीच बदलावी लागेल. आज गुगलच्या मुख्य केंद्रात जगाच्या पाठीवर कोणत्या संगणकातनं काय माहिती शोधली जातीये याचा इत्थंभूत तपशील असतो. म्हणजे पॅरिस असो वा परभणी. कोणत्याही ठिकाणी माहिती महाजालात गुगलच्या साह्य़ानं संगणकावर काहीही काम सुरू असेल तर त्याच क्षणाला त्याच वेळी तो सगळा तपशील गुगलच्या मुख्यालयात तसाच्या तसा मिळत असतो. ही माहिती लक्षात नाही तर अब्जात असते. एका बुधवारी सहज या तज्ज्ञांनी तिचा तपशील मागवला. त्या विशिष्ट क्षणाला गुगलवर जगभरातल्या दोन लाख ५० हजार संगणक वापरणाऱ्यांना तब्बल नऊ लाख २० हजार विविध माहितीस्थळांचा तपशील पुरवला जात होता. यावरून गुगलच्या साठय़ात काय आणि किती जमा होत असेल याचा अंदाज यावा. आता ही सर्व माहिती पुसून टाका, स्मृतिकोशात साठवून ठेवू नका असा युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसचा आदेश आहे.
हे कसं करायचं हे ठरवण्यासाठीच गुगलचे वरिष्ठ अधिकारी आता दर बुधवारी भेटू लागलेत.
काय गंमत आहे..जनसामान्यांना प्रश्न पडतो..काय काय लक्षात ठेवायचं आणि कसं..हा. पण गुगलला चिंता आहे..काय काय आणि कसं विसरायचं..ही.
आता ती चिंता सुंदर पिचाई याला भेडसावणार आहे. सुंदर मूळचा भारतीय. त्यामुळे अमुकतमुक..मरेपर्यंत विसरणार नाही ही भाषा त्याच्या परिचयाची असणारच. आता तीच नेमकी त्याला बदलावी लागणार आहे.
पण सुंदर आता बरीच र्वष अमेरिकेत आहे. त्यामुळे कदाचित त्याची ही भारतीय सवय गेलीही असेल. आणि त्याला हेही कळलं असेल की यशस्वी होण्यासाठी नुसतीच स्मरणशक्ती आवश्यक नसते. काय लक्षात ठेवायचं हे कळावं लागतंच. पण ते कळता कळता काय विसरायचं..हेही कळावं लागतं. नाही तर उगाच सगळंच लक्षात राहतं आणि आठवत बसलो तर सगळंच आठवतं..नुकतेच पगंबरवासी झालेले शायर बशर नवाज लक्षात राहील अशा शब्दांत सांगून गेलेत तसं..निगाह दूर तलक जा के लौट आएगी..करोगे याद तो हर बात याद आएगी..

girish.kuber@expressindia.com
@girishkuber
गिरीश कुबेर