सूर्यास गिळू पाहणाऱ्या राहू आणि केतूची मुंडकी परमेश्वराने धडापासून कापली. त्यातील राहूचे शीर आजच्या अहमदनगर जिल्ह्य़ात येऊन पडले. ते जेथे पडले ती राहुरी. अशी एक दंतकथा सांगितली जाते. त्यामुळे त्यात काही अर्थ नाही असे म्हणावे तर या जिल्ह्यातील सुसंस्कृतपणाला, विवेकाला सातत्याने विकृतीचा राहू गिळत असताना दिसत आहे. हा रावसाहेब पटवर्धनांचा, थोरल्या विखे पाटलांचा जिल्हा. समाजवाद, साम्यवादाचा विचार करणारा हा जिल्हा आणि सहकार चळवळीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली तोही हाच जिल्हा. पण या भूमीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हा विकृतीचा टारफुला जोमाने वाढत चालल्याचे दिसत आहे. जातीभेदातून, खानदानाच्या इज्जतीच्या मागास कल्पनांतून खूनबाजी असो की सामूहिक बलात्कार, अशाच घृणास्पद घटनांमुळे हा जिल्हा वारंवार बातम्यांमध्ये येत आहे. ही येथील समाजधुरिणांसाठी, जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणाऱ्यांसाठी लज्जास्पद अशीच बाब आहे. नेवासे तालुक्यातील राजेगाव येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने तर वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या या जिल्ह्य़ाची मानच शरमेने खाली गेली आहे. या गावामध्ये हरिनाम सप्ताह बसविण्यात आला. किमान त्या सात दिवसांत तरी तेथील ग्रामस्थांच्या कानावरून संतांचे सुविचार गेले असतील. पण खरे तर कानावरून असे सुविचार जावेत आणि त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर व्हावा हा हेतूच हल्ली नामशेष झालेला आहे. सप्ताह आयोजित केले जातात ते मिरवण्यासाठी. राजेगावच्या सरपंचाने आपल्या कृतीनेच हे सिद्ध केले आहे. हरिनाम सप्ताहासाठी गावाकडून वसूल करण्यात आलेल्या वर्गणीचा हिशेब एखाद्याने मागितला हा काही गुन्हा नाही, परंतु केवळ त्या रागाने या सरपंचाने आणि त्याच्या साथीदाराने त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्या मारहाणीने जबर जखमी झालेली ती व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असताना या सरपंचाने पुन्हा त्याच्या घरावर हल्ला केला आणि त्याच्या २१ वर्षीय मुलाला एका खोलीत डांबून ठेवून त्या मुलाच्या मातेवर बलात्कार केला. असा घृणास्पद गुन्हा घडला की आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारची आठवण येते. खरे तर आता त्या राज्यांनीच बिहारचा महाराष्ट्र झाला आहे की काय वगैरे सवाल विचारला पाहिजे. आपल्यातील विकृतीने हीच वेळ आणली आहे. सर्वच पक्षांत असे सत्तेचा माज चढलेले गावगुंड पायलीला पन्नास मिळतील. निम्मा महाराष्ट्र आज एकीकडे दुष्काळाने होरपळत आहे. नगरमध्येही गारपिटीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, परंतु बाकीच्या महाराष्ट्रात बागायती शेतीने गबर होत चाललेला एक मस्तवाल वर्गही उभा राहिलेला दिसत आहे. बागायतीतून आलेला पैसा, त्यातून दूध डेअरी, विविध कार्यकारी सोसायटी येथपासून सहकारी साखर कारखान्यांपर्यंत आणि तेथून विविध सत्तास्थानांवर मिळविलेला कब्जा यातून हा वर्ग माजावर आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील या बलात्काराच्या घटनेमागे ही अहंगंडित प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीकडे कोणी मान वर करून पाहता कामा नये.. तसे केल्यास मान मोडली जाईल. हाच संदेश हा वर्ग या गुन्ह्य़ांतून देत आहे. गरज ही प्रवृत्ती खुरपण्याची आहे. नाही तर एका गुन्ह्य़ातील गुन्हेगार गजाआड गेले तरी त्यांच्या जागी दुसरे उभे राहतील. रौंदाळा कायम राहील..