ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने नाबाद ८९ धावांची तडफदार खेळी साकारूनही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वानखेडे स्टेडियमवर आंद्रे रसेलने सामन्याच्या अखेरच्या षटकात विराट कोहलीला ठोकलेल्या षटकारानंतर संपूर्ण स्टेडियम सून्न झाले. सर्वांची निराश झाली. स्टेडियमवर विराटच्याही डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, पराभवाला कवटाळून न बसता विराटने आज वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव इतिहास जमा झाल्याचे दाखवून देत आत्मविश्वास वाढवणारे ट्विट केले.
‘कधीही आशा सोडू नका, आयुष्य कधी संपत नाही, ते फक्त सुरू होतं. या तरुणाला सलाम’, असे ट्विट करून विराटने एका खास व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळणाऱया आमीर हुसैन लोन या तरुणाचा हा प्रेरणादायी व्हिडिओ आहे.