आपल्या अभूतपूर्व खेळीने विराट कोहलीने टीम इंडियाला ट्वेन्टी २० विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत नेऊन पोहचवले. मात्र, त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवूनही टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, टीम इंडियाचा हा पराभव भारतीय चाहत्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारला. याबाबत सर्व भारतीयांचे विराटने इन्स्टाग्रामवरुन आभार मानले आहेत.
टीम इंडियाचा फोटो शेअर करत विराटने म्हटले की, आपण काहीवेळा जिंकणार तर काहीवेळा हरणार. परंतु, याच आठवणी आपल्याला पुढे घेऊन जात असतात. आम्ही झालेल्या चुकांमधून शिकून प्रत्येक दिवशी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सहका-यांसह या विश्वचषकाला अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. तसेच, प्रत्येक सामन्याच्यावेळी आमच्या पाठीशी राहणा-या प्रत्येक चाहत्याचे मी आभार मानतो. पुढच्यावेळी आम्ही अधिक चांगला खेळ खेळू, असा आशावाद त्याने व्यक्त केला आहे.