आपला मोर्चा संकेतस्थळावरून मोबाइलवर वळविण्याचा मानस असलेल्या ई-व्यापार कंपन्यांनी नुकतेच मोबाइलसाठी स्वतंत्र संकेतस्थळं सुरू केली आहेत. यापूर्वी या कंपन्यांचे अ‍ॅप्स बाजारात होतेच. अ‍ॅप्स आणि मोबाइल संकेतस्थळांमध्ये नेमका काय फरक आहे.
संपूर्ण विश्व आपल्या खिशात आणून देणाऱ्या मोबाइलमुळे तरुणाईचे जीवन खरोखरच स्मार्ट झाले आहे. पण या स्मार्ट जीवनातही आता अनेक गोष्टींचा कंटाळा येऊ लागला आहे. म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये अ‍ॅप्सची गर्दी होते आणि त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळेही आपण कंटाळत असतो. यामुळे अ‍ॅप्सपेक्षा संकेतस्थळ बरे असे म्हणायची वेळ आता पुन्हा आली आहे. यामुळेच की काय पण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या बडय़ा ई-व्यापार कंपन्यांनी मोबाइल संकेतस्थळ सुरू करण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅप्स वापरताना किंवा संकेतस्थळ वापरताना काही अडचणी सातत्याने जाणवतात त्यावर एक प्रकाशझोत टाकूया.
.
अ‍ॅप्सचा भडिमार
आपल्या फोनची साठवणूक क्षमता आणि आपण वापरत असलेली इंटरनेट सुविधा यावर आपला अ‍ॅप्सचा वापर अवलंबून असतो. सध्या बाजारात प्रत्येक छोटय़ा गोष्टीसाठी अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. आपल्या गरजेनुसार आपण अ‍ॅप डाऊनलोड करत असते. यातील अनेक अ‍ॅप आपण एकदा वापरून सोडून देतो. पण त्या अ‍ॅप्सच्या नोटिफिकेशन्स आपल्यालसमोर गर्दी करत असतात. तसेच फोनमधील साठवणूक क्षमता कमी करत असतात. यामुळे अ‍ॅपपेक्षा जर मोबाइल संकेतस्थळ उपलब्ध झाले तर ते आपण आपल्याला पाहिजे त्या वेळेला सुरू करू शकतो.

नेटवर्क क्षमता
सध्या भारतात टूजी, थ्रीजी, फोरजी सुविधा उपलब्ध आहेत. पण आजही देशात केवळ ६६ टक्के जणांकडेच स्मार्ट फोन आहे. त्यापैकी ६० टक्के वापरकर्ते मोबाइल ब्रॉडब्रँडचा वापर करतात. तरीही नेटवर्क जोडणीची समस्या असतेच. एकदा अ‍ॅप डाऊनलोड केले की ते कमीत कमी इंटरनेटमध्ये काम करू शकते असे कपन्यांचे म्हणणे आहे. तरीही अनेकदा नेटवर्क जोडणी जाते. आपण अ‍ॅप क्रॅश होतात किंवा ते काम करेनासे होतात. यामुळे नेटवर्क जोडणी ही खूप महत्त्वाची ठरते. इरिक्सनने केलेल्या पाहणीनुसार देशात ६० टक्के मोबाइलधारकांना नेटवर्कची समस्या जाणवते. ६३ टक्क्यांना फोन कट होणे, बोलताना मध्येच आवाज जाणे, नेटवर्कची तुटक जोडणी आणि थ्रीजीची कमीत कमी उपलब्धता या समस्या जाणवतात. प्रवासात असताना अ‍ॅप काम न करण्याचा अनुभव ६८ टक्के मोबाइलधारकांना जाणवत असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. तर ४८ टक्क्यांना इंटरनेट वापरताना टूजी आणि थ्रीजी यातील वेगाचा फरक जाणवतच नाही. यामुळे संकेतस्थळ सुरू करताना आपण एका ठिकाणी उभे राहून ते करू शकतो.

माहिती चोरी
आपण जेव्हा एखादे अ‍ॅप डाऊनलोड करतो, त्या वेळेस आपल्याकडून भरमसाट परवानग्या घेतल्या जातात. अनेकदा या परवानग्या संबंधित अ‍ॅप वापरण्याच्या दृष्टीने उपयुक्तही नसतात. पण त्या परवानग्या दिल्याशिवाय आपल्याला ते अ‍ॅप वापरता येत नाही. यामुळे अर्थातच आपल्या मोबाइलमधील सर्व म़ाहिती अ‍ॅप कंपनीकडे जाते. ही माहिती आम्ही वापरकर्त्यांच्या परवानगीचे दुसऱ्या कुणाला तरी देतो असा कंपन्यांचा दावा असतो. मात्र ही परवानगी आपण अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वीच त्यांनी घेतलेली असते. यामुळे आपली माहिती कधी व कुणाला दिली जाते हे आपल्याला नेमके समजू शकत नाही. तसेच माहिती चोरी होऊ नये यासाठी आम्ही चांगली सुरक्षा व्यवस्था वापरतो असा दावाही कंपन्या करतात, पण प्रत्यक्षात माहिती उघड झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण जर एखादी सुविधा वापरत असू तर आपल्या मोबाइलमधली नेमकी माहितीच कंपनीला मिळते. तसेच किती माहिती द्यायची किती नाही द्यायची हे आपण आपले ठरवू शकतो.

अ‍ॅपचे फायदे-तोटे
अ‍ॅपचा वापर हा आपण कधीही कुठेही करू शकतो. अ‍ॅपमधील अनेक गोष्टी या ऑफलाइन वापरता येतात. यामुळे इंटनेटचा वापर तसा कमी होतो. संकेतस्थळाच्या तुलनेत अ‍ॅपचा वेग जास्त असल्यामुळे ते वापरणे कधीही आवडीचे ठरते. पण अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करत असताना किंवा अ‍ॅप वापरण्यासाठी परवानगी देत असताना आपल्या माहितीच्या सुक्षिततेचा प्रश्न समोर उभा राहतो. तसेच अनेक अ‍ॅप्स आपण एकदा वापरून तसेच ठेवतो. यामुळे साठवणूक जागा वाया जाते.

मोबाइल संकेतस्थळांचे फायदे
मोबाइल संकेतस्थळे ही हलक्या आवृत्तीची तयार केलेली असतात. म्हणजे यामध्ये डेस्कटॉपपेक्षा थोडी कमी आणि अ‍ॅपपेक्षा थोडय़ा जास्त दर्जाची सुविधा मिळू शकते. एखादे उत्पादन पाहायचे असेल तर त्याचे छायाचित्रही आपल्याला अधिक चांगले समजू शकते. तसेच वैयक्तिक माहिती शेअर करण्याची गरज नसते. साठवणूक क्षमताही वाया जात नाही. पण हे संकेतस्थळ वापरण्यासाठी इंटरनेटचा वेग चांगला किंवा इंटरनेट सेवा अखंडित असणे गरजेचे आहे.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com