पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निर्मूलनासाठी बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री पालिकेत सज्ज ठेवण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या आदेशानुसार नगर परिषद कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज झाल्यानंतर एक मान्सूनपूर्व सरावदेखील पार पाडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यांशी सामना करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाल्याचा दावा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या सरावादरम्यान केला आहे. कुळगांव-बदलापूर नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा विभाग आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून या विभागाच्या वतीने बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज धरणात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मान्सूनपूर्व सराव शिबिराचे आयोजन केले होते. त्यात आपत्ती निर्मूलनाची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती.
बदलापूर शहराच्या हद्दीतून उल्हास नदी व विविध भागांतून नाले जात असून पावसाळ्यात हे नाले तुंबल्याने पाणी साठून पूर परिस्थिती ओढावते. हे पाणी जवळील नागरिकांच्या घरात हमखास शिरते. शहरातील हेंद्रेपाडा, शनिनगर, शिरगांव, कात्रप, बॅरेज परिसर, रेल्वे स्थानकाजवळील नाला, मोहनानंद नगर आदी भागांत असले प्रकार घडतात. तसेच उल्हास नदीचे पाणी वाढल्यानेही पूरसदृश परिस्थिती ओढावते. या पाश्र्वभूमीवर पालिकेने नालेसफाईचा दावा केला आहे, तो आता कितपत खरा अथवा खोटा हे नाले तुंबल्यावरच कळणार आहे. तसेच या व्यतिरिक्त शहरात झाडे कोसळणे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने होणारे गंभीर अपघात शहरात पावसाळ्याच्या काळात घडत असतात. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेच्या आपत्ती निर्मूलन विभागाकडे दोन इंजिनच्या बोटी, १ रबर बोट त्याशिवाय ३५ लाइफ जॅकेट, २० एअर टय़ूब, १५ लाइफ रिंग, झाडे कापण्याची दोन यंत्रे, तसेच दोरखंड व बचावासाठी लागणारे इतर साहित्य आदींचा साठा करण्यात आला आहे.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींशी सामना करण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून, सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांसाठी संक्रमण शिबिरेदेखील तयार करण्यात येणार आहेत.
भागवत सोनोने, अग्निशमन अधिकारी, कुळगांव-बदलापूर नगर परिषद.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील पाणी साठणाऱ्या विभागाचा अंदाज घेतला असून येथे आपत्ती आल्यास त्या निवारणासाठी पालिकेकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभाग ४ बोटी, १५ लाइफ जॅकेट, १० रिंग, १५ लिव्हिंग बॅग व बचावासाठी लागणारे अन्य साहित्य यासह सज्ज आहे.
पालिकेतील वरिष्ठ अधिकारी
बदलापूर आपत्कालीन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. २६९०२७१ व २६९०८९०.

कल्याण, डोंबिवलीत पूर्ण नियोजन
भगवान मंडलिक
पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर त्यावर मात करण्यासाठी पालिकेने कल्याण, डोंबिवली पालिकेत २४ तास सुरू राहणारे आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केले आहेत. या कक्षात दूरध्वनी क्रमांक आहे. पाच ते सहा कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्यात आले आहेत. पूरपरिस्थिती, धोकादायक इमारतींची पडझड अशा काही घटनांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास या कक्षातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याला सुरुवात करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पूरपरिस्थितीच्या वेळी करावयाच्या जबाबदार निश्चित करण्यात आल्या आहेत. इमारत कोसळली, एखाद्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर त्याची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत. खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे पुरामुळे स्थलांतर करावे लागले तर संक्रमण शिबिरात रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. या शिबिरातील रहिवाशांना भोजन, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अग्निशमन विभागाने होडय़ा, दोर, वल्हे या सामग्रीची तयारी केली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर नागरिकांना पालिका अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर उपलब्ध व्हावेत म्हणून पालिकेच्या जनसंपर्क विभागाने अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे भ्रमणध्वनी यांची माहिती देणारी संपर्क पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका नगरसेवक, अधिकारी, जागरूक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बीएसएनएल, महावितरणनेही पावसाळ्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
* महापालिकेचे नियंत्रण कक्ष
’कल्याण – २२११३७३.
’डोंबिवली – २४४३८००
* आपत्तीची पूर्वसूचना देणारे अधिकारी
’रवींद्र पुराणिक – ९८३३४१३०९६.
’दीपक भोसले – ९३२०३०४०४७
’प्रशांत भागवत – ९८२१११५६७८.
* निर्वासन अधिकारी
’अशोक बैले – ९८३३१७९७५७.
’भालचंद्र नेमाडे – ९२२३५३८४२१.
* मदत
’दिलीप गुंड – ९८२०४५२४६६
’यशवंत सोनवणे – ९९३०६१४४३३.
* आणीबाणी सेवा
’सुधाकर कुलकर्णी – ९८२०९११६२३.
’कैलास वाडेकर – ९९६०८०२०४१
* अन्न-खाद्य पुरवठा
’सुभाष भुजबळ – ९८७०९६८७१६.
’प्रमोद कुलकर्णी – ९८२१०५०६२४.
* संक्रमण शिबीर
’चंद्रकांत कोलते – ९८२११५८३८०.
’सुरेश आवारी – ९४२३४६२४१४.
*  गोविंदवाडी नियंत्रण कक्ष
’परवेझ तडवी – ९९२०२४८७३०
’प्रमोद मोरे – ९९२००३७९२२
* वैद्यकीय मदत
’डॉ. स्मिता रोडे – ९८२०७६००३५.
’डॉ. लीलाधर म्हस्के ९९६७३२९५८९.
’डॉ. किशोर भिसे – ८१०८६३६७१६
* आपत्कालीन यंत्रणा
’मंत्रालय नियंत्रण कक्ष – २२०२७९९०
’जिल्हाधिकारी कक्ष – २५३८१८८६
’महावितरण नियंत्रण कक्ष – १८००२३३३४३५
* नागरी संरक्षण दल
’लक्ष्मीकांत डावरे – ९५९४९८९४८८.
’बीएसएनएल एस. डी. गेडाम – ९४२३९८४९४७
* अधिकारी वर्ग
’तहसीलदार किरण सुरवसे – ९००४९९५९९९
’गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे ९८२२२७३८१७.