१२ ढाबे, चार सव्‍‌र्हिस सेंटरवरही कारवाई
एमआयडीसीच्या वतीने शुक्रवारी पुन्हा चोरून पाणी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५० अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. याव्यतिरिक्त १२ ढाबे आणि चार सव्‍‌र्हिस सेंटर्सवर कारवाई करण्यात आली. मलंगगड ते टाटा पॉवर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
एकीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये भीषण पाणीटंचाई असताना दुसरीकडे मोठय़ा प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचे दिसून येते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा एकदा पाणी चोरी पूर्ववत होत असल्याचे गेल्या दोन महिन्यांत दिसून आले आहे. कारण नळजोडणी खंडित करण्याव्यतिरिक्त चोरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. या अनधिकृत नळजोडण्यांद्वारे उपलब्ध होणारे पाणी अनधिकृत बांधकामे तसेच गॅरेजमध्ये गाडय़ा धुण्यासाठी वापरले जाते.

कुंपणच शेत खाते
एमआयडीसीचा एक कर्मचारीच अनधिकृत नळजोडण्या करणाऱ्यांना मदत करीत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. लवकरच त्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.