ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या चार महिन्यांत या रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इन्क्युबेटरच्या अभावामुळे ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. येथील एनआयसीयूमध्ये १६ इन्क्युबेटर असून एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने अनेकदा एका इन्क्युबेटरमध्ये दोन ते तीन बालकांना ठेवले जात असल्याचे शासकीय रुग्णालयात पाहावयास मिळते आहे. नवजात अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने त्यांना संसर्ग होण्याचा धोका बळावत आहे. या विभागात एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४७ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३६ बालकांना मुंबई येथील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. भविष्यात या रुग्णालयात अद्ययावत सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.