विठ्ठलवाडी आगारातून दापोली, कणकवलीसाठी रविवारपासून जादा बस सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने घेतला आहे. या विशेष बससेवा सुरू कराव्यात, यासाठी कोकण प्रवासी संघटनेने महामंडळाकडे तगादा लावला होता.
विठ्ठलवाडी आगारातून दापोली बस संध्याकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे. ही बस आंबेत, मंडणगडमार्गे दापोली येथे प्रवासी वाहतूक करणार आहे. कणकवली बस संध्याकाळी सात वाजता विठ्ठलवाडी आगारातून सुरू करण्यात येणार आहे. ही बस लांजा, राजापूरमार्गे कणकवलीला पोहोचेल.
सुट्टीनिमित्त शहरी भागातील कोकणवासीय मोठय़ा संख्येने कोकणातील आपल्या गावी जातो. मात्र या दोन्ही बस सुरू करण्यात या वेळी महामंडळाकडून उशीर झाल्याने, प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. कोकण प्रवासी संघटनेचे मुरलीधर शिर्के या विशेष बससेवा सुरू कराव्यात म्हणून प्रयत्नशील होते.