येथील सांबरी गावात विजेच्या धक्क्याने शनिवारी सहा जनावरांचा मृत्यू झाला. त्यात चार म्हशी, एक गाय आणि एका वासराचा समावेश आहे.

ही जनावरे शनिवारी सकाळी सांबरी गावाजवळील माळरानावर चरण्यासाठी गेली होती. वीज वितरण कंपनीची विद्युत वाहिनी तुटून माळरानावर पडलेली होती. या वाहिनीशी संपर्क येताच विजेच्या धक्क्याने या जनावरांचा मृत्यू झाला. ही जनावरे सांबरी गावातील महेंद्र भोईर यांची होती. या प्रकरणी कुळगाव-बदलापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, या घटनेची नोंद केली आहे. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नुकसानभरपाई देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.