ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आकाशात भिडणाऱ्या डोंगररांगेत आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात. मलंगगडपासून सुरू होणाऱ्या या डोंगररांगेत चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड आदी किल्ले आहेत, त्याशिवाय माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाणही आहे. याच डोंगररांगेतील बदलापूरजवळचा चंदेरी किल्ला सर्वाचे लक्ष वेधून घेतो. अतिशय अवघड असलेला हा किल्ला उत्तुंग आहे. आकाशाला भिडणारा सुळका लक्ष वेधून घेतो आणि कधी आपण या किल्ल्यावर स्वार होतो, असे वाटते. बदलापूर आणि वांगणी यांच्या मध्ये हा किल्ला आहे. चिंचोली या गावातील वाट आपल्या या किल्ल्याकडे घेऊन जाते. बदलापूर किंवा वांगणी स्थानकापासून चिंचोली हे गाव अध्र्या तासाच्या अंतरावर आहे. चिंचोली गावातून समोर दोन उत्तुंग असे डोंगराचे सुळके दिसतात. त्यापैकी एक म्हैसमाळ आहे, तर दुसरा डोंगर म्हणते चंदेरी दुर्ग. चिंचोली गावातून दोन वाटा किल्ल्यावर जातात. एक वाट खडकाळ असून, दुसरी वाट लाल मातीतली आहे. मात्र खडकाळ, दगड-धोंडय़ातून जाणाऱ्या वाटेवरून वर चढताना एक वेगळीच मजा येते. या दोन्ही वाटा वर असणाऱ्या एका पठारावर घेऊन जातात. या पठारावरून अर्धा तास चालल्यानंतर चंदेरी आणि म्हैसमाळ यांच्या बेचक्यामध्ये येऊन आपण पोहोचतो. बाजूला झाडी जरा विरळच दिसते. केवळ बोडके डोंगर असल्याने उन्हाचे चटके जरा जास्तच जाणवतात. मात्र येथून गगनचुंबी चंदेरी कातळदुर्ग फारच सुंदर दिसत होता. या पठारावरून वर चंदेरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात करायची. येथे वर जाण्यासाठी काही मातीच्या पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. तासाभराच्या चढणीनंतर आपण एका माथ्यावर पोहोचतो. तेथून दोन्ही बाजूस दरी असलेल्या या माथ्यावरील एक वाट गुहेकडे जाते. गुहेत आल्यावर एकदम थंडगार वाटते. गुहेत एक लहानसे शिवलिंग आहे. शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे आणि समोर सात-आठ घंटा लटकावलेल्या आहेत. या शिवलिंगाचे दर्शन घेऊन झाल्यावर आपण सभोवतालचा प्रदेश न्याहाळू लागतो. अगदी दूपर्यंत डोंगराच्या लांबच लांब रांगा दिसतात. समोर प्रबळगड आणि इर्शाळगड दिसतो. माथेरानची रांगही स्पष्टपणे दिसते. गुहेच्या अलीकडे एक पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळय़ात या टाक्यात पाणी साचते आणि ते नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत पुरते असे म्हणतात. गडावर पिण्यायोग्य पाणी मिळावे म्हणून पूर्वी येथे हे टाके बांधले असावे. या गुहेच्या पुढे सुळक्यापाशीही एक पाण्याचे टाके आहे. काही गिर्यारोहक हा सुळका चढण्याचाही प्रयत्न करतात. पावसाळय़ात हा किल्ला जरा हिरवागार दिसतो. किल्ल्याजवळ एक धबधबा वाहत असल्याने पर्यटक त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात. मात्र पावसाळा संपला की येथील डोंगर बोडके होतात, नावालाही झाडी आढळत नाही. त्यामुळे उन्हाचा मारा करत किल्लारोहण करावे लागते. या किल्ल्याच्या इतिहासाविषयी फारसी माहिती उपलब्ध नाही. मात्र शिवरायांच्या स्वराज्यात हा किल्ला होता, अशी माहिती मिळते. वर दगडी तटबंदी आहे, हीच काय ती किल्ल्याची खूण. तटबंदीचीही खूप पडझड झाली आहे. चंदेरीच्या सुळक्यावर एक ट्रेकिंग संस्थेन छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आहे. किल्ल्यावर किल्लेपणाच्या खुणा अगदी कमी असल्या तरी उत्तुंग असलेला हा किल्ला सर करणे गिर्यारोहणाची आवड असलेल्या प्रत्येकालाच आवडते. चंदेरी किल्ला कसे जाल? कल्याण-कर्जत मार्गावरील वांगणी स्थानकात उतरावे. तेथून रिक्षाने चिंचोली गावात जाता येते. २० ते २५ मिनिटात चिंचोली गाव लागते. या गावातून चंदेरीला जाता येते. बदलापूर स्थानकातूनही बेंडशिळमार्गे चिंचोली गावात जाता येते. बदलापूरहून रिक्षा चिंचोलीपर्यंत जातात. पण आधी रिक्षाचे भाडे ठरवून घ्यावे.