दिवाळीमुळे तिकीट खिडक्यांवर गर्दी तिकीट खिडक्यांवर लागणाऱ्या रांगांचा त्रास कमी व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली ‘एटीव्हीएम’ सेवा बंद पडल्याने ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. दिवाळीच्या सुटीच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असताना ठाणे स्थानकातील ४० पैकी ३० ‘एटीव्हीएम’ गुरुवारी पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे उरलेली दहा यंत्रे आणि तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकातील प्रवाशांना तिकिटांसाठी रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये यासाठी स्मार्ट कार्ड अर्थात एटीव्हीएम मशीन्सचा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासून या एटीव्हीएम यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे प्रवाशांना ही सुविधा असून नसल्यासारखी आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. अनेक वेळा मशीन्समधील संपलेले तिकिटांच्या गुंडाळ्या पुन्हा भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पैसे रेल्वेकडे जमा झाले तरी तिकिटे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नाणी टाकून तिकीट काढण्याचाही पर्याय उपलब्ध असला तरी अनेक वेळा नोटा आणि नाणी जमा झाली तरी तिकीट मिळत नसल्याचेही अनेकांनी सांगितले. दिवाळीच्या काळात नागरिक मोठय़ा प्रमाणात रेल्वे प्रवास करत असल्याने त्या काळात रेल्वे सेवेबरोबर एटीव्हीएमही सुरळीत चालू असल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल. तिकिटांचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी एटीव्हीएमवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे या सेवेसाठी ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर येऊ नये. - नंदकुमार देशमुख, प्रवासी संघटना