भाडे एक ते दोन रुपयांनी कमी होण्याची शक्यता कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या रिक्षाचा प्रवास लवकरच एक ते दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या शहरांप्रमाणेच कल्याण, डोंबिवलीतही ‘सीएनजी’ दरानुसार रिक्षा भाडे आकारण्यात यावे, असा प्रस्ताव कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधीकरणाकडे (एमएमआरटीए) पाठवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली असून येत्या शुक्रवारपासून निर्णयाची अंमलबजावणी होण्याची चिन्हे आहेत. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘आरटीओ’ कार्यालयात परवाना नूतनीकरण, योग्यता, सक्षमता प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकाला रिक्षेला ‘सीएनजी’ किट बसवून घेण्याची सक्ती केली होती. या पाठपुराव्यामुळे सुमारे वीस ते एकवीस हजार रिक्षाचालकांनी रिक्षांना ‘सीएनजी’ किट बसवून घेतले आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरात यापूर्वी फक्त एक ते दोन ‘सीएनजी’ पंप होते. ही संख्या आता पाच झाली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कोन, उल्हासनगर भागात सीएनजी पंप आहेत. त्यामुळे सीएनजी रिक्षांनाच चालक पसंती देत आहेत. मुंबई, ठाणे परिसरात सीएनजीचा वापरावर रिक्षा प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे प्रवाशांना किलोमीटर मागे भाडेही कमी द्यावे लागते. हाच लाभ कल्याण-डोंबिवली उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील रिक्षा प्रवाशांना द्यावा, म्हणून कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘एमएमआरटीए’कडे एक प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावर प्राधीकरणाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीत कल्याण-डोंबिवली शहरात सीएनजी दराप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच शासन अध्यादेश निघणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. * रिक्षाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रवासापर्यंत आहे तेच भाडे राहणार. * पहिल्या टप्प्यानंतर होणाऱ्या एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी-जास्तच्या टप्प्याचे भाडे १८ रुपयांवरून १६ रुपये होण्याची शक्यता. * पहिल्या टप्प्यानंतर रिक्षा मीटरमधील युनिट बदलतात. त्या युनिटचे दर आता बदलणार आहेत. * पहिल्या टप्प्याच्या प्रवासात जेथे १३ रुपये प्रवासी भाडे होते. तेथे १२ रूपये दर आकारण्यात येईल. * भागीदारी पद्धतीने (शेअर) पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दर सुविधेचा लाभ मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील ऐंशी टक्के रिक्षा ‘सीएनजी’वर धावत आहेत. सीएनजीच्या अधिक वापरामुळे शहरातील प्रदूषण कमी होणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना सीएनजी किट बसवून घेण्याची सक्ती करण्यात आली होती. तो उद्देश सफल झाला आहे. प्रवासी हित आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टी प्रस्तावाच्या माध्यमातून साध्य होणार आहेत. नंदकिशोर नाईक , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण